ग्रीन यादीत नाव नसल्याने शेतकरी हवालदिल

0

शहादा । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. याची एकत्रित आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतकर्‍यांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने या बँकांचे कर्जदार शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत. तर बँकांकडे पात्र शेतकर्‍यांंची कुठलीच माहिती नसल्याने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत नाव येणार तरी कधी असा प्रश्‍न शेतकर्‍यांंमधून उपस्थित केला जात आहे.

माहिती ऑनलाईन अपडेट नंतर मिळणार लाभ
राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या कर्जदार शेतकर्‍यांंची माहिती मुख्य कार्यालयामार्फत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन भरली आहे. शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी भरलेला अर्ज व बँकांनी भरलेली माहिती याचे संगणकीकृत वर्गीकरण करून पात्र शेतकर्‍यांची ग्रीन यादी तयार होणार आहे. सदर यादी ऑनलाईन अपडेट झाल्यानंतर पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र कर्जमाफीची यादी तयार करताना रोज नवीन बदल केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत मोजक्याच शेतकर्‍यांची नावे ग्रीन यादीत आली आहेत. काही गावांमधील एकही शेतकर्‍याचे नाव ग्रीन यादीत नाही. नेमकी कुठली कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे पात्र यादीत नाव आले नाही. याबाबत विचारणा करण्याची सोय कुठेच नसल्याने चिंता वाढली आहे. आता राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार असलेल्या पात्र शेतकर्‍यांची नावे थेट बँकेत येणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी राबवणार, पात्र शेतकर्‍यांचे नाव यादीत कधी येणार याबाबत कुठलीही निश्‍चित माहिती मिळालेली नाही आहे.