जयपूर । गैरसमजातून घाबरलेल्या प्रवाशाने ट्विट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच मदतीची याचना केल्यामुळे शुक्रवारी मुंबई, दिल्ली आणि जयपुर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान खराब हवामानामुळे जयपूरला वळवण्यात आले. विमान अचानक जयपूरला वळवण्यात आल्याने एक प्रवासी चांगलाच घाबरला. विमानाचे अपहरण झाल्याचा संशय आल्याने त्याने थेट पंतप्रधानांना ट्विट करत त्यांच्याकडे मदत मागितली.
या ट्विटमुळे मोठा गोंधळ उडला, प्रसंगावधान बाळगत जयपूर विमानतळावर विमान पोहोचताच तेथील सुरक्षारक्षकांनी चौकशी केली. आम्ही तीन तासांपासून जेट एअरवेजच्या 9 डबल्यू 355 या विमानात आहोत. या विमानाचे अपहरण झाल्यासारखे वाटत आहे. आम्हाला कृपया मदत करा,असे ट्विट मुंबईहून जाणार्या एका प्रवाशाने पंतप्रधान मोदींना केले. प्रवाशाने पंतप्रधान मोदींच्या नावाने ट्विट करताच विमानतळ सुरक्षा दलांनी लगेच जयपूर विमानतळावर चौकशी केली. दिल्ली-मुंबई मार्गावरील जेट एअरवेजचे हे विमान जयपूरला उतरताच ट्विट करणार्या जेट एअरवेजच्या संबंधित प्रवाशाची चौकशीदेखील करण्यात आली. प्रवाशाच्या ट्विटमुळे विमानतळावरील सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी दिली. विमानाचे अपहरण झाल्याच्या शक्यतेबद्दलच्या ट्विटनंतर संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या. ट्विटमधील माहिती मिळताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, नागरी उड्डाण सुरक्षा विभाग आणि स्थानिक सुरक्षा दलांना सूचना देण्यात आल्या होत्या असे जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले. संबंधित प्रवासी जयपूरला उतरताच त्याची चौकशी करण्यात आली.