घोटाळ्यात साथ दिली नाही म्हणून मराठेंना अटक-राज ठाकरे

0
मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या एकदिवसीय दौ-यावर असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ‘बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रविंद्र मराठेंवरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात आहे. मराठेंच्या अटक प्रकरणी मुख्यमंत्री सत्य सांगत नाहीत, पीक कर्जमाफीच्या योजनेतील घोळ झाकण्यात मराठेंनी सरकारला सहकार्य न केल्यानेच त्यांना तडकाफडकी अटक करण्याचा निर्णय सरकारने घेतला’.  प्लास्टिकबंदीच्या मुद्यावर उत्तर सरकारने द्यावे असे सांगून ते म्हणाले की, रामदास कदमांनी नात्यावर भाष्य करु नये प्लास्टिकबंदीचा निर्णय कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयासारखाच आहे,असेही ते म्हणाले.
प्लास्टिक बंदीला विरोध
स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली निव्वळ कर आकारणी करण्यात आली. असे सांगून ठाकरे म्हणाले की,’आधी सरकारने आपले काम नीट करावे, मगच लोकांकडून दंड वसूल करावा. प्लास्टिकबंदी करताना पर्यायी व्यवस्था दिली का नाही? प्लास्टिक वाईट नाही, व्यवस्थापन नीट नाही इतर अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यासाठी का धजावत नाही? नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था नाही. प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांकडून आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लॅस्टिकबंदी केली गेली नाही ना?, अशी शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली. काही काळानंतर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय केराच्या टोपलीत जाऊन सर्व काही पूर्ववत होईल, असा दावाही राज यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.
जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामे नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असे आवाहनही राज ठाकरेंनी केलं. प्लॅस्टिकबंदीसारख्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे? असा सवाल करून ते म्हणाले की, हा निर्णय सरकारचा आहे की फक्त विशिष्ट खात्याचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे म्हणाले की, प्लास्टिक व्यापाऱ्यांकडून निवडणुकीच्या फंडासाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न शिवसेना करत असावी अशी शंका घेण्यास वाव आहे. ते म्हणाले की,नाशकात मनसेने कचऱ्यापासून खत प्रकल्पाची निर्मिती केली, बाकीच्या महापालिकांनी शहरात स्वच्छता राखण्यासाठी काय काय केलं?बंदी असेल तर सरसकट सर्वच प्लास्टिकवर घालावी, ब्रँडेड चिप्स पाकिटांच्या प्लास्टिकला मुभा का?
प्लास्टिकबंदीची काय घाई होती? असे सवाल देखील त्यांनी केले.