मुंबई: चक्रीवादळाच्या आगमनाचा अंदाज घेत योग्य नियोजन व आपत्कालीन कृती आराखड्याची जलदगतीने अंमलबजावणी तसेच जमीनदोस्त झालेल्या वीजयंत्रणेची विक्रमी वेळेत उभारणी व दुरुस्ती करून महावितरणने ‘तौक्ते’ चक्रीवादळावर मात केली आहे. गेल्या पंधरवड्यात टप्प्याटप्प्याने ‘तौक्ते’बाधीत प्रमुख सात जिल्ह्यांतील 35 लाख 87 हजार (99.96 टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा जलदगतीने सुरळीत केला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला धडक देत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड तसेच पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला होता. यामध्ये 201 उपकेंद्र, 1342 उच्चदाब वीजवाहिन्या व 36030 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता व हानी देखील झाली होती. त्यामुळे या सातही जिल्ह्यातील 5575 गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला व 35 लाख 87 हजार 261 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.