चर्चेला न ठेवताच विधेयके पटलावर!

0

५ बिलांबाबत दिलीप वळसेपाटलांचा नापसंती ठराव

मुंबई : विधेयके मंजुर करायची असतील तर चार दिवस अगोदर ती पटलावर आली पाहिजेत त्यानंतर ती चर्चेला घ्यायची असतात परंतु तसे न करता ही विधेयके, बिले घेण्यात आली आहेत त्यामुळे या ५ बिलांवर नापसंती ठराव आम्हाला दयायचा आहे. त्यामुळे ती बिले चर्चेला घेवू नये अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी सभागृहात केली.

मंगळवारच्या कामकाजामध्ये तीन ठराव दाखवले आहेत यावर चर्चा कशी होणार आहे. कामकाज पत्रिका तयार करताना विधीमंडळातील सचिवमंडळाने जी खबरदारी घ्यायला हवी होती ती घेतली नाही असा आक्षेप दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी नोंदवला. ११ नंबरमध्ये ५ विधेयके दाखवली आहेत आणि ५ बिले मंजुर करण्याचेही दाखवले आहे. मी विधानसभा कामकाजातील १२३ कडे लक्ष वेधितो. विधेयके मांडतांना ती चर्चेला कशी घ्यावीत. १२३ मध्ये त्याची नोंद आहे. १२३ ड नंतर परंतुके आहेत. त्यामुळे विधेयके मंजुर करायची आहेत तर चार दिवस अगोदर ती पटलावर आली पाहिजेत त्यानंतर ती चर्चेला घ्यायची असतात परंतु तसे न करताच ही बिले घेण्यात आली आहेत. त्यामुळे ५ बिलांवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही दिलीप वळसेपाटील म्हणाले.

दिलीप वळसेपाटील बोलत असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे त्यांना रोखत होते त्यावेळी वळसेपाटील यांनी ‘तुम्ही मला बोलू देत नाही अध्यक्षमहोदय’…’मग मी रागवतो’ अशा भाषेत आपला संताप व्यक्त केला. तर दुसऱ्यावेळी विधेयकाबाबत सांगत असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्येच सांगण्याचा प्रयत्न केला असता ‘मला बोलू द्या, तुम्ही माझं म्हणणं रेकॉर्डवरुन काढून टाका मात्र माझा आवाज दाबू नका’…असे सुनावताच अध्यक्षांनी ‘तुमचा आवाज कोण दाबेल’ असे सांगितले. मी आज २८ ते ३० वर्षे काम सभागृहामध्ये करतोय. स्थगन प्रस्ताव फेटाळणे हा अधिकार अध्यक्षमहोदय तुम्हाला आहे. परंतु आज इतके महत्वाचे स्थगन प्रस्ताव येत असताना त्यांची भूमिका सभागृहासमोर यायला हवी होती असेही वळसेपाटील म्हणाले.