पुणे । यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी झाले. परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, याचे श्रेय पोलिस दलाला आहे. उत्सव साजरा करताना पोलिस, शासन, मंडळे, नागरिक यांच्या एकत्रित भावना महत्त्वाच्या असतात. सगळ्या भावना एकत्र येऊन काम होते, तेव्हा उत्सवात यश मिळते. पोलिसांनी कर्तव्याच्या पलिकडे जाऊन भावना ठेवल्या, ते फार महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही पुण्याची संस्कृती आहे. त्यामुळे आपण गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता सर्व सण उत्सवात सलोख्याचे वातावरण ठेवू आणि विघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार नाही हा संदेश देऊया, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने गणेशोत्सवात चोख बंदोबस्त करून सहकार्य करणार्या पोलिस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विश्रामबाग फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, माजी आमदार मोहन जोशी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, हेमंत रासने, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह विश्वस्त व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
कार्यक्रमात पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, दक्षिण विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त बसवराज तेली, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त संजय बाविस्कर आदींना सन्मानित करण्यात आले. तसेच पोलिस दलातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांसह जय गणेश व्यासपीठातील गणेशोत्सव मंडळांच्या विश्वस्त आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलिसांविषयी माणुसकी दाखवा
जोपर्यंत आपण उत्सवात सूचनांचे पालन करणार नाही, तोपर्यंत अनुशासित उत्सव होणार नाही. पोलिसांवर मोठा ताण पडतो. पोलिसांना देखील वाटते की गणपतीच्या दर्शनासाठी कुटुंबासह जावे. मात्र, त्यांना 14-18 तास ड्युटी करावी लागते. त्यामुळे पोलिसांविषयी प्रत्येकाने माणुसकी दाखविली पाहिजे, असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले. हेमंत रासने यांनी स्वागत केले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.