चांदगडच्या तरुणाच्या खून प्रकरणी दोघे ताब्यात

0

धुळे | शिंदखेडा तालुक्यातील चांदगड येथील अजय कोळी या तरुणाच्या खून प्रकरणी सोनगीर येथील दोन संशयितांना ठोस पुरावा नसतानाही १७ दिवसात

जेरबंद करण्यात नरडाणा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे, याचा तपास केला जाईल.

शिंदखेडा तालुक्यातील चांदगड येथील अजय उत्तम कोळी (१८) हा तरुण ३१ जुलै रोजी एमएच १८ बीएफ ८९६५ या क्रमांकाच्या दुचाकीने मोबाईल दुरुस्तीसाठी
सोनगीरला आला होता. गावातीलच एकाला सोबत घेऊन त्या तरुणाने सीम कार्डसह मोबाईल दुरुस्तीला दिला. त्यानंतर सोनगीर फाट्यावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरले त्याने त्याच्या मित्राला सोडले आणि घरी निघाला. मात्र, तो घरी पोहचलाच नाही. त्यामुळे त्याचा भाऊ जिगर कोळीसह नातलगांनी त्याचा शोध घेताना. तो सापडत नसल्याने अखेरीस ४ रोजी दुचाकीसह भाऊ बेपत्ता झाल्याची माहिती सोनगीर पोलिसांना देण्यात आली.
शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा रस्तालगत वाघाडी गावाच्या शिवारात वनहद्दीत दुर्गंधी येत असल्याची माहिती एका वन मजुराने सोनगीर पोलिसांना
दिली होती. सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तरुणाच्या मृतदेहावर टाकण्यात आलेले दगड बाजुला करुन ओळख
पटविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हे पार्थीव अनोळखी वाटत होते. परंतु त्याच्याजवळ मिळालेला फोटो आणि कागदपत्रावरुन हरविलेला तरुण अजय
कोळीच असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा भाऊ जिगर कोळी याला बोलावून अजय कोळीची ओळख पटविली .नरडाणा पोलिसात गुन्ह्याची नोंद
झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना अवघ्या १७ दिवसात खुनाचा तपास लावण्यात आला. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस
अधीक्षक विवेक पानसरे, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

यांना घेतले ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार नरडाणा पोलिसांची वेगवेगळी दोन पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने सोनगीर, वाघाडी, वालखेडा, चांदगड, वायपूर, सार्वे,
मुडी-मांडळ, एमआयडीसी नरडाणा अशा विविध ठिकाणी फिरून मयत तरुणाच्या नातेवाईकांसह मित्रांशी संपर्क साधला. त्यातून जे संशयित वाटले त्यांच्यावर पाळत ठेवली आणि सोनगीर येथील सुनील भिवसन ठाकरे (२०) आणि त्याचा मित्र विजय आबा भिल (२२) रा. एकलव्य चौक, सोनगीर या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या या पथकाला यश आले.

असा आहे घटनाक्रम
३१ जुलैपासून अजय कोळी हा बेपत्ता होता. सोनगीर पोलीस स्टेशनला ४ आॅगस्टला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. ५ आॅगस्ट रोजी वाघाडी खुर्द शिवारात त्याचा मृतदेह आढळला. १८ आॅगस्ट रोजी दोन संशयितांना त्यांच्या घरातून जेरबंद करण्यात यश आले आहे.