पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची माहिती
इंदापूर : दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व पाणीटंचाईवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. पशुधन वाचविण्यासाठी चारा उत्पादन करण्यासाठी 65 कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. दुष्काळ निवारणाच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जलयुक्त शिवारची कामे पुरंदर तालुक्यात झाली. मात्र, पावसानेच पाठ फिरवल्याने ही दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, असे रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जानकर यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा नुकताच पार पडला, त्यावेळी दौंडज येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना जानकर बोलत होते. या दौर्यामध्ये भाजप तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, डॉ. अर्चना पाटील, संदीप चोपडे, पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, बापूराव सोलनकर, राजेंद्र नलावडे, संतोष खोमणे आदींसह विविध खात्यांचे अधिकारी सहभागी झाले होते.
याप्रसंगी दौंडजच्या सरपंच रेखा जाधव, दामूअण्णा कदम, दत्तात्रय कदम, महादेव माने, वाल्हेचे पशुवैद्यकीय अधिकारी एच. एस. सोनवणे आदी उपस्थित होते. दौर्यादरम्यान शेतकर्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सचिन लंबाते यांनी प्रास्ताविक केले. सरपंच रेखा जाधव यांनी आभार मानले.
माणसे जगवायला प्राधान्य देण्याची गरज
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात येत असून, जनावरांसाठी तब्बल 65 कोटी रुपये चारा उत्पादनासाठी खर्च करण्यात येत आहेत. या दुष्काळात अधिकार्यांनी माणसे जगवायला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे जानकर यांनी सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी दौंडज खिंड ते पिसुर्टीपर्यंतच्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी वीर धरणामधून जेजुरीकडे जाणार्या पिण्याच्या व कंपनीच्या बंद पाईपमधून दौंडज खिंड येथील ओढ्यात पाणी सोडून परिसरातील गावांचा पिण्याचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. यावर पशुसंवर्धनमंत्री जानकर यांनी संबंधित अधिकार्यांना ग्रामस्थांच्या समोर याबाबत अधिक सखोल माहिती घेण्यास सांगून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.