शिर्डी । चार धाम यात्रेसाठी रेल्वे सेवा सुरू करणार असून रेल्वेचे सर्वेक्षण सुरू झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते आज शिर्डीत बोलत होते. यावेळी प्रभू म्हणाले लेह-लद्दाखमध्ये रेल्वे सेवा पोहचवणार असून देशातील अनेक भागात रेल्वेचे जाळे निर्माण केले जाणार असून अधिकाधिक शहरे जोडली जाणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
काय म्हणाले रेल्वेमंत्री
शिर्डीतील कार्यक्रमात ना. सुरेश प्रभू म्हणाले की, देशातील प्रत्येकाला श्रद्धेने जिथे-जिथे जायचं आहे असेल तिथपर्यंत रेल्वे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे काम होण्यासारखं आहे ते लगेच केले जात असून जे जास्त अवघड आहे तेही लवकरच मार्गी लागेल. रेल्वेकडून आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे येणार्या काळात रेल्वे प्रवाश्यांच्या गरजा लक्षात घेऊन मार्गक्रमण करत असून अनेक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. तक्रार नोंदविण्याचे अनेक मार्ग प्रवाश्यांना उपलबद्ध करून देण्यात आले असून कुठल्याची मार्गाने तक्रार आली तरी तिचे लगेच निवारण करण्यात येत आहे.
बॅकलॉग भरला जातोय
ना. सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या विकासाचा अनुशेष भरून निघत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, रेल्वेचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून मार्गक्रमण सुरु आहे तसेच सर्वसामान्य माणसाच्या हिताचे काम आम्ही करत असून गेल्या अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढला जात असल्याचेही प्रभू यावेळी म्हणाले. रेल्वे स्थानकावर 20 ठिकाणी एक रूपयात शुद्ध पाणी सेवा लवकरच होणार असून देशामध्ये साडे आठ लाख कोटी रूपये रेल्वे विकासावर खर्च होणार आहेत. राज्यातील रेल्वे विकासावर दीडलाख कोटी खर्च केले जाणार आहेत तसेच अनेक नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.