भुसावळ/चाळीसगाव : इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात हल्लीची पिढी एकलकोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला जगण्याचे खरे आनंद मांडणारे भारतीय पारंपरीक खेळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खेळ विश्वात विद्यार्थी चांगलेच रमले होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जेसीआय झोन 13 चे माजी झोन अध्यक्ष जेसी निलेशजी गुप्ता (सी.ए.), सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, स्वप्नपूर्ती अकॅडमीचे संचालक आकाश धुमाळ, माजी अध्यक्ष खुशाल पाटील, प्रितेश कटारीया, अध्यक्ष धर्मराज खैरनार, डॉ.प्रसन्न अहिरे, प्रकल्प प्रमुख नितीन कोतकर, सचिव मयूर अमृतकार आदी उपस्थित होते. चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई देशमुख उद्यानात जेसीआय चाळीसगाव तर्फे ‘शोध हरवलेल्या सुखाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मन सुदृढ राहण्यासाठी खेळणे गरजेचे : गुप्ता
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा माजी अध्यक्ष निलेश गुप्ता यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, जसे शरीराने सुदृढ राहण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो तसेच मनाने सुदृढ राहण्यासाठी आपण खेळ खेळलो पाहिजे यामुळे तणाव कमी होऊन माणूस निरोगी आयुष्य जगतो. मोबाईलच्या आहारी न जाता दिवसातून किमान एक तास तरी खेळासाठी द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
बालपणातच मिळते आयुष्य जगायला : आकाश धूमाळ
मार्गदर्शक आकाश धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, बालपणातच खरे आयुष्य जगायला मिळते. त्यामुळे शिक्षणाबरोबरच जगायलाही शिका, आपल्या भौतिक विश्वातून बाहेर पडून समाजामध्ये काय सुरू आहे याच्याकडेही लक्ष द्या. खेळांचे मैदान मोबाईलमध्ये आणून एकटे पडू नका त्यासाठी खर्या मैदानांवर जाऊन खेळा, मौज करा. पालकांनीही आपल्या मुलाला रोज खेळायला पाठवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पारंपरीक खेळात रमले विद्यार्थी
यावेळी गोट्या, लगोरी, चकरी, मामाच पत्र हरवलं, लंगडी, आंधळी कोशिंबीर, टायर टायर, रस्सी खेच, गोणी उड्या असे विविध पारंपारिक खेळ कसे खेळतात याविषयी प्रत्यशिक करून मार्गदर्शन आकाश धुमाळ यांनी केले. विद्यार्थ्यांनी काही तासांसाठी आपल्या मोबाईलमधून बाहेर पडत खेळांचा मनमुराद आनंद लुटला तर पालकांनीही यात आपला सहभाग नोंदवत खेळांची मौज केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आज आम्हाला जगावेगळा आनंद मिळाला, असे सांगत यापुढेही असे कार्यक्रम घेण्याची विनंती केली. प्रास्ताविक अध्यक्ष धर्मराज खैरनार यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत ठाकरे आभार सचिव मयूर अमृतकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र शिरुडे, मनोज पाटील, वकार बेग, महेंद्र कुमावत, साहिल दाभाडे, आतिश कदम, सुवालाल छाजेड, सलमान खान, बापूसाहेब खैरनार, कमलेश पवार यांच्यासह सर्व जेसीआय माजी अध्यक्ष, सदस्य यांनी परीश्रम घेतले.