चाळीसगाव तालुक्यातील ‘कण्हेर गड’ लवकरच पर्यटकांच्या भेटीला

0

सह्याद्री प्रतिष्ठानच्या आवाहनाला उद्योजक मंगेश चव्हाणांची आर्थिक मदत
चाळीसगाव –– शहरापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौताळा अभयारण्यात व पाटणादेवी मंदीर परिसरात असलेला जंगलात अनेक पर्यटनस्थळे अजूनही सहज पोहचणे शक्य नसल्याने इतिहासापासून दुर्लक्षित राहिले आहेत. त्यापैकी एक असलेला कन्हेरगड हा किल्ला होय. मात्र गेल्या महिन्याभरापासून गड किल्ले संवर्धनासाठी राज्यात आघाडीवर असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या शोधण्यासाठी मोहिम हाती घेतली असून यासाठी येणाऱ्या खर्चासाठी युवा उद्योजक मंगेश चव्हाणांनी भरीव आर्थिक मदत देण्याची जबाबदारी घेतल्याने हा दुर्लक्षित कण्हेरगड लवकरच पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

कण्हेरगडाचा असा आहे इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या हिंदवी स्वराज्याची किल्यांच्या यादीत कन्हेरागडाचा स्पष्ट उल्लेख आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की येथून किल्ले मल्हारगड, किल्ले पेडका, किल्ले अंकाई, किल्ले अंतुर व राजदेहऱ्याचा ढेरी किल्ला पाहता येतो त्याकाळी या किल्ल्यावर असलेल्या बुरुजावरुन शत्रू वर सतत टेहळणी केली जात होते. या किल्ल्यावर जाण्यासाठी पाटणादेवी मंदिरा अगोदर जातांना उजव्या बाजूला महादेवाचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे त्याच्या पाठीमागून वर चढण्यासाठी पायऱ्यांचे अस्तित्व नष्ट झालेले अवशेष शिल्लक आहेत गेल्या तीस पस्तीस वर्षे पूर्वी येथे जैन मुनी भावसागर महाराजांची समाधी बांधण्यात आली आहे तर थोडे अंतर वर चढून गेल्या वर प्रथम जैन लेणीचे दर्शन होते ही दुर्लक्षित जैन लेणी नजरेस पडते ही गुहा म्हणजे गौताळा अभयारण्या चे वैभव असूनही पर्यटकापासून रस्ता नसल्याने दूर राहिली आहे तसेच पुढे काही अंतर पार केल्यावर सीता न्हाणी व पठारावर गेल्यावर मुस्लिम कबर नजरेस पडते येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिमतीला असलेले मुस्लिम सहकारी नमाज पठण करीत असावेत तसेच सर्वात माथ्यावर महावीर हनुमानाचे मंदिर असून समोर मोठे पटांगण आहे या परिसरात तैनात कर्मचारी पहारेकरी सेवक तसेच वेळोवेळी येणारे सेनापती सरदार बलोपासना करित असावेत असा इतिहास आढळतो

पायऱ्यांचा घेतला जातोय शोध !
सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे व सहकारी शिवप्रेमी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने येथे चाळीसगाव कर हौशी पर्यटक यांना नेऊन किल्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मात्र गडावर जाणारी पायवाट खाली पायऱ्या असून त्या दरवर्षी च्या पावसाने बुजल्या गेल्या आहेत. त्यांचा शोध घेत त्याच्यावर साचलेले माती काढून ही वाट पुन्हा एकदा भाविकांच्या सोयीसाठी सुरू व्हावी ही चळवळ राबविण्याचे ठरविले.

उद्योजक मंगेश चव्हाणांची आर्थिक मदत
या किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायरीवरून तीन चार टप्प्याने हा रस्ता थेट कन्हेरगडपर्यंत पोहचतो यासाठी स्वयस्फूर्तीने मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावर सह्याद्री प्रतिष्ठान ने केले होते. याला प्रतिसाद मिळाला मात्र कमी पडणारी जेवढी आर्थिक मदत लागेल ती देण्याची गरज मंगेश चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांकडे बोलून दाखविली. त्यामुळे ही चळवळ झपाट्याने पूर्ण होणार आहे. याची मोठी चर्चा तालुक्यात झाली. दातृत्वसाठी सतत पुढे असणारे युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांच्या या भूमिकेचे कौतुक देखील सर्व स्तरावर करण्यात आले.