चिंता नको; पाऊस सरासरी गाठणार!

0

पुणे। नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसर्‍या टप्प्यात देशात 100 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, कमी अधिक 8 टक्क्यांची तफावत राहील असे हवामान खात्याने स्पष्ट केले. पावसाने दडी मारल्यानेे शेतकरीवर्ग हवालदिल होता. हा अंदाज शेतकर्‍यांना सुखावणारा असून, मनातील चिंतेचे ढग दूर करणारा आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून, 15 ऑगस्टपासून उर्वरित राज्यात पावसाची शक्यता आहे.

खरीप पिके धोक्यात
हवामान खात्याने प्रिन्सिपल कॉम्पेनट रिग्रेशन मॉडेल आणि मान्सून मिशन कपल्ड फॉरकास्टिंग सिस्टीम या मॉडेलच्या आधारे मान्सूनच्या दुसर्‍या टप्प्याचा अंदाज वर्तविला आहे. एल निनो, इंडियन ओशन डायपोल हे घटक सर्वसाधरण स्थितीत आहेत. यामुळे यंदा दुसर्‍या टप्प्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पावसात पडणारे खंड, वाढते ऊन पावसाची उघडीपमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील खरिपाच्या पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला असताना, 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात कमी अधिक 9 टक्क्यांची तफावत गृहीत धरण्यात आली असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकरीवर्गाचा जीवात जीव आला आहे. 12 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 289.6 मिलीमीटर (88 टक्के) पाऊस झाला आहे. यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा 30 टक्के तर विदर्भात सरासरीपेक्षा 28 टक्के तुटीचा पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने सरासरी गाठली आहे.