सिंधुदूर्ग- सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर पहिले विमान आज उतरले. विमान उतरून काही तासही झालेले नाहीत तोवर यावरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. परंतु, केसरकर यांनी राणेंचा आरोप फेटाळला असून डीजीसीएने परवानगी दिल्यानंतरच हे विमान उतरवल्याचा दावा केला.
सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर चेन्नईहून उड्डाण केलेले विमान आज सकाळी उतरले होते. चेन्नईवरुन उड्डाण केलेले विमान गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर चिपी विमानतळावर लँड झाले. या १२ आसनी विमानातून गणपती बाप्पाचे आगमन झाले. चाचणीसाठी हे विमान उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, डीजीसीएची परवानगी नसताना हे विमान कसं उतरवण्यात आले, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.
आमदार नितेश राणे यांनी देखील केसरकरांवर टीकास्त्र सोडले. विमानतळाच्या सुरक्षिततेचे कोणतेही मानक पूर्ण करण्यात आलेले नाही. विमानतळासाठी ६२ एनओसीची गरज असते. यातील अवघ्या २५ टक्के एनओसींची पूर्तता करण्यात आली. फक्त एक खासगी विमान विमानतळावर उतरवण्यात आले. यासाठी ना सरकारची ना डीजीसीएची परवानगी होती, असे नितेश राणे म्हणाले.
रस्ते बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या आय.आर.बी. कंपनीला (आय.आर.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि.) बांधा वापरा व हस्तांतरण करा या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यासाठी सन २००९ मध्ये करार करण्यात आला होता. एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प त्यावेळी १७५ कोटीचा होता. नंतर ३८० कोटीच्या घरात पोहोचला होता.