भारताची सीमा ओलांडून सहा किलोमीटरआत आले
आयटीबीपीचा गृह मंत्रालयाकडे अहवाल
नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सीमाभागात असलेल्या उत्तर पेंगाँगमध्ये चीनने जवळपास सहा किलोमीटर आत घुसखोरी केली आहे. यासंदर्भातील एक अहवाल इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस म्हणजेच आयटीबीपीने भारतीय गृह मंत्रालयाकडे सोमवारी पाठविला.
तीन दिवस घुसखोरी
आयटीबीपीच्या अहवालानुसार, येथील उत्तर पेंगाँग तलावाजवळच्या परिसरात चिनी सैन्याने गाड्यांच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी, 7 मार्च आणि 12 मार्च 2018 या तीन दिवशी घुसखोरी केली. मात्र, आयटीबीपीच्या जवानांनी विरोध केल्यानंतर चिनी सैन्य माघारी परतले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चिनी सैनिकांनी याच परिसरात भारतीय सुरक्षा रक्षकांवार दगडफेक केली होती. अरुणाचल प्रदेशातील असाफिलामध्ये भारताने आक्रमण केल्याचे चीनने बीपीएमच्या बैठकीत म्हटले होते. यावेळी आक्रमण शब्दाला भारताने आक्षेप घेतला होता. गेल्यावर्षी सिक्कीम सेक्टरच्या डोकलाममधील रस्ते बांधणीवरुन भारत आणि चीनमध्ये जवळपास 73 दिवस तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुन्हा दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.