नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाची घटक कंपनी असलेल्या एसबीआय क्रेडिट कार्डकडून ग्राहकांना दणका देण्यात आला आहे. यापुढे एसबीआय कार्डकडून चेक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडिट कार्डाच्या बिलापोटी 2 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास आता बँकेकडून 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. के्रडिट कार्डांच्या पेमेंटची तारीख जवळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चेक जमा होतात. त्यावेळी विलंब शुल्कासंदर्भात वाद होतात. हे वाद टाळण्यासाठी आणि चेक चलन संपुष्टात आणण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
2 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या चेकवर हे शुल्क आकारलं जाणार असले तरी यातून एसबीआयचे ग्राहक असल्यास आणि एसबीआयचाच धनादेश वटवायचा असल्यास त्या ग्राहकांना सूट देण्यात आली आहे. इतर बँकेच्या ग्राहकांना शुल्क द्यावे लागेल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. चेक पेमेंट करणारे एकूण 8 टक्के ग्राहक आहेत. त्यापैकी 6 टक्के ग्राहक दोन हजार रुपयांपेक्षा जास्तीचा व्यवहार करतात. त्यामुळे उर्वरित 2 टक्के ग्राहकांनाच शुल्क द्यावे लागेल, असेही कंपनीने सांगितले. दरम्यान या निर्णयामुळे इतर बँकांच्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कारण स्टेट बँक इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या शाखा सहजासहजी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहक एसबीआयलाच पसंती देतात. मात्र या निर्णयानंतर इतर बँकांच्या ग्राहकांची अडचण वाढणार आहे.