पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा
वडगाव मावळ : बंद पडलेल्या कंपनीतील साहित्य चोरून नेण्यास विरोध केल्याने मित्राने मित्राचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाल्यानंतर वडगाव मावळ पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. ही घटना 27 सप्टेंबर रोजी टाकवे येथे उघडकीस आली. याप्रकरणी नवनीत भीमराव पाटील (वय 47, रा. कान्हेफाटा) आणि अर्जुनसिंग ननसिंग सुनार (वय 45, रा. टाकवी बु.) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. विरेंद्रसिंग (रा. बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 27 सप्टेंबर रोजी इंद्रायणी वसाहत इंडस्ट्रीजजवळ रोडच्या कडेला एक पुरूष जातीचे अनोळखी व्यक्तीचे प्रेत पडल्याची माहिती अर्जुनसिंग याने पोलिसांना दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसल्याने तसेच मृत्यूचे नेमके कारण न समजल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद देखील झाली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पोलिसांनी शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.
हे देखील वाचा
पोशाखावरून मिळाली माहिती
हा मृतदेह रस्त्यापासून 15 ते 20 फुट अंतरावर गवतात आढळून आल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत तपास सुरू केला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पोशाखावरून कंपनीतील कामगार असल्याची शक्यता असल्याने मयताची ओळख पटविण्याकरीता टाकवे भागातील कंपन्यांमध्येे माहीती काढली. त्यावेळी मृत्यू झाल्याची माहिती देणारा अर्जुनसिंग हा अस्मा मेटल या बंद पडलेल्या कंपनीचा वॉचमन असून त्याच्यासोबत नेहमी दिसणारा गुरूजी नावाची व्यक्ती काही दिवसांपासून दिसली नाही, अशी माहिती मिळाली. त्यावरून अर्जुनसिंग याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. अर्जुनसिंग याने जाणीवपूर्वक ही माहिती लपवून ठेवल्याचे समोर आले. मृत्यू झालेला व्यक्ती हाच गुरुजी उर्फ विरेंद्रसिंग असल्याचे त्याने सांगितले. अर्जुनसिंग, कान्हे गावात राहणारा नवनीत पाटील व गुरूजी (मयत) असे तिघेजण अस्मा मेटल कंपनीत एक वर्षापुर्वी कामाला होते. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर नवनीत पाटील आणि गुरुजी (मयत) यांचे काम बंद झाले. त्यानंतर अर्जुनसिंग हा वॉचमन म्हणून त्याच कंपनीत काम करत होता. याचा फायदा घेऊन या तिघांनी संगमताने कंपनीमधील मशीनचे पार्ट चोरून विकले. याबाबतची माहिती समोर येऊ नये यासाठी विरेंद्रसिंग याची ओळख लपवली, असल्याचेही अर्जुनसिंग याने सांगितले.
नवनीत पाटील 25 सप्टेंबर रोजी कंपनीतील पार्ट चोरून नेण्यासाठी कंपनीचा वॉचमन अर्जुनसिंगकडे आला होता. परंतु त्यास अर्जुनसिंग व गुरूजीने (मायताने) सामान चोरण्यास विरोध केला. त्यावरून नवनीत याने गुरूजीला कंपनीच्या बाहेर रोडवर नेले. हाताने आणि दगडाने मारहाण केली त्या मारहाणीत गुरुजीचा मृत्यू झाला. ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक रमेश खुणे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, हवालदार प्रकाश वाघमारे, नाईक रौफ इनामदार, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गणेश महाडिक, सचिन गायकवाड, गुरू जाधव यांच्या पथकाने केली.