कोल्हापूर- दो आँखें बारह हाथ, नवरंग अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायांकन करणारे त्यागराज पेंढारकर यांचे आज दुपारी कोल्हापूरमध्ये ९३ व्या वर्षी निधन झाले. पेंढारकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार असून चित्रपटांचा चालता बोलता इतिहास हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनील, मुलगा महेश, मुलगी तेजस्विनी, सून अनघा आणि नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे चिरंजीव त्यागराज पेंढारकर यांना सुरुवातीला अभियंता व्हायचे होते. मात्र, यानंतर ते छायाचित्रकार म्हणून काम करु लागले. मुंबईत आल्यावर ते राजकमल स्टुडिओसाठी काम करु लागले. सहाय्यक कॅमेरामन व मग मुख्य कॅमेरामन म्हणून त्यांनी छाप पाडली. मराठी, हिंदीसह गुजरात व मद्रासी सिनेसृष्टीतही त्यांनी काम केले. दो आँखें बारह हाथ, राजकमल, नवरंग, श्री ४२० अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. मराठीत त्यांनी यशोदा, आंधळा मारतो डोळा, देवा शपथ खर सांगेन या चित्रपटांसाठी काम केले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी हा पुरस्कार, एस. एन फिल्म सोसायटीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, व्ही शांताराम व दादासाहेब फाळके तांत्रिक क्षेत्रातील पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.