अहमदनगर : अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम याला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, त्याने स्वतःवरील सर्व आरोप नाकारात मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे छिंदमने न्यायालयात सांगितले.
छिंदम् म्हणतो राजकीय वादातून खोटी फिर्याद दाखल!
छिंदमला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी जामीन मंजूर केला. 6 मार्चरोजी छिंदम याने स्वत:च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. आपल्यावरील आरोप छिंदम याने नाकारले असून, फिर्यादीबरोबर राजकीय वाद असल्याने माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, अशी भूमिका छिंदम याने न्यायालयात मांडली. तसेच आई आजारी असून, तिची देखभाल करायची आहे. मी कुटुंबातील कर्ता असल्याने माझा जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद केला. छिंदम याने वकील नसल्यामुळे स्वत:च न्यायालयात त्याची बाजू मांडली. न्यायालयाने छिंदमचा जामीन मंजूर करताना, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दररविवारी 12 ते 2 या वेळेत पोलिस ठाण्यात हजेरी देणे व पोलिस तपासात हस्तक्षेप न करणे अशा अटी घातल्या आहेत.