छोट्या-मोठ्या उद्योगांचे सरसकट वीज बिल माफ करा

0

भुसावळात शिवसेना पदाधिकार्‍यांची मागणी : प्रशासनाला निवेदन

भुसावळ : वीज ग्राहकाला वीज बिलात जोड भारानुसार आयोगाने मंजूर केलेल्या दराने किमान काही रक्कम स्थिर आकार म्हणून आकारली जाते. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने देशभरातील सलून दुकाने, वाईन शॉप्स, रसवंती, ज्युस दुकाने, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, हॉटेल्स, छोटे-मोठे उद्योग, मंदिरे गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याने या सर्व वीज ग्राहकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व पदाधिकार्‍यांना वीज देयके माफ करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांना सेना पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.

यांची होती उपस्थिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी ही शासन आदेशाने कराव लागलयाने या कालावधीत स्थिर आकार लावण्यात येऊ नये व संपूर्ण तीन महिने बंद असलेल्या आस्थापनांची वीज देयके माफ करावी, अशी मागणी भुसावळ शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. प्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तर विभागाचे शहर प्रमुख निलेश महाजन, दक्षिण विभागाचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, पवन बाक्षे, लोकेश वारके यांच्या शिष्टमंडळाने सोशल डिस्टन्सचे पालन करीत केली. निवेदनावर पांडुरंग कोळी, नरेंद्र पाटील, प्रमोद चौधरी, राजेश इंगळे, रुपेश पाटील, रमण इंगळे, योगेश पाटील, सुनील कोळी, नमीत पाटील उपस्थित होते. या निवेदनावर जळगाव रोड व जामनेर रोड परिसरातील व्यावसायिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सहा महिने कोणाचीही वीज तोडणी करू नये : प्रा.धीरज पाटील
एखाद्या महिन्यात वीज ग्राहकांचा वीज वापर शून्य असेल, तरीही हा स्थिर आकार भरणे अनिवार्य असते. व्यापार व औद्योगिक वीज ग्राहकाचा जोडभार खूप मोठा असल्याने त्यांच्या बिलातील स्थिर आकाराच्या रकमा देखील मोठया असतात मात्र लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ करणे गरजेचे आहे तसेच पुढील सहा महिने थकबाकीमुळे कोणाचीही वीज तोडणी करू नये, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.

परीवाराचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न
शासनाने पुकारलेल्या संचारबंदीत रोजगार हिरावल्याने परीवाराचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न सर्व सामान्यांना पडलेला असून त्यातच आता तीन महिन्याचे वीज बिल भरणे कठीण झाले आहे. कारण कोविड-19च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक परीस्थिती बिकट असून त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे, असे मत शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे व निलेश महाजन यांनी मांडले.