खेड: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अतिवृष्टीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गबंद ठेवण्यात आला आहे. हा महामार्ग संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. या महामार्गावर सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली मार्गही बंद करण्यात आला आहे.
वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि साताऱ्या जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जगबुडीची पाणी पातळी ६.५० मीटर असून इशारा पातळी ६.०० मीटर एवढी आहे. जगबुडी नदीने आज सकाळी ९.३० वाजता ७.१० मीटरची पातळी गाठून इशारा पातळीही ओलांडल्याने खेडची रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोऱ्यातील ३२ गावांचा संपर्क तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.