‘जणू काही झालेच नव्हते’; पायलट, गेहलोत पुन्हा एकत्र

0

जयपूर: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्ष संपूर्ण देश बघत आहे. कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत सरकार अडचणीत आले. सचिन पायलट यांना बंडाची किंमत चुकवावी लागली. त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. यादरम्यान पायलट आणि गेहलोत गटाने एकमेकांवर टीका टिप्पणी करत आरोप-प्रत्यारोप केले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी तर व्यक्तिगत आरोप करत पायलट यांना ‘निकम्मा, नकारा’ म्हटले होते. मात्र आता सचिन पायलट यांचे बंड शमले असून ते कॉंग्रेसमध्ये परतले आहे. त्यानंतर आज गुरुवारी १३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री गेहलोत आणि पायलट यांची भेट झाली आहे.

काँग्रेस नेते सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. उद्या शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होते आहे. या अधिवेशाबाबत चर्चा करण्यासाठी सचिन पायलट हे अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. गेहलोत यांच्या निवस्थानावरील चित्र पाहता राजस्थानच्या राजकारणात ‘जणू काही झालेच नव्हते’ का? असा प्रश्न पडतो. एकमेकांवर तोंडसुख घेऊनही ही मंडळी एकत्र झाल्याने यातून सामान्य कार्यकर्त्यांनी देखील धडा घ्यावा. सामान्य कार्यकर्ते नेहमी एकमेकांशी भांडत असतात, एकमेकांच्या जीवावर देखील उठतात.