पुणे । महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण रक्षण या महत्त्वाच्या मुद्यावर पुण्यातील युपीएससी करणार्या एका युवकाने जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ सायकल मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये तब्बल 40 दिवसांत बारा राज्यातून हा सायकल प्रवास पूर्ण करीत सहा हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केले आहे. पुण्यातून सुरू झालेली ही सायकल जनजागृती फेरी चेन्नई-कोलकाता-दिल्ली-मुंबई-पुणे अशी सुवर्ण चतुर्भुज होती. याचा समारोप गुरुवारी सेनापती बापट रस्त्यावर करण्यात आला.
प्रितेश क्षीरसागरने 1 ऑक्टोबरपासून सेनापती बापट रस्त्यावरून सायकल फेरीला सुरुवात केली. देशात महिलांवरील अत्याचार, महिला सक्षमीकरण त्याचबरोबर वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे. या सर्व गोष्टीना आळा कसा घालावा? यासाठी प्रत्येकजण शक्कल लढवतोय. मात्र युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणार्या प्रितेश ने फक्त चर्चांमध्ये भाग न घेता जनजागृतीसाठी सायकल फेरी काढून यशस्वीरीत्या पूर्ण केली.या मोहिमेत सायकल फेरीचा मार्ग पुणे- कोल्हापूर -हुबळी-बेंगलोर-चित्तोर-चेन्नई-नेल्लोर-भीरमुनिपतिनंम-कोरलम-कृष्णप्रसाद (ओडिसा)-मलीपूर-कोलकत्ता-झारखंड-औरंगाबाद (बिहार)-वाराणसी-कानपूर-आग्रा-नोएडा-दिल्ली-राजस्थान-अहमदाबाद-सूरत-मुंबई-लोणावळा-पुणे असा होता. जवळपास 12 राज्यांच्या महत्त्वाच्या शहरांमधून तब्बल सहा हजार किलोमीटर एवढ्या अंतराचा एकूण प्रवास प्रितेश ने केला. या मोहिमेमध्ये त्याने दररोज जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ही मोहीम त्याने काही मित्रांच्या मदतीने आणि स्वखर्चाने केली आहे.
मोहिमेबाबत बोलताना प्रितेश म्हणाला, या मोहिमेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्याविरोधातील लढा, महिलांचे सक्षमीकरण या विषयांबरोबरच झाडे लावा, झाडे जगवा हा पर्यावरणाचाही संदेश देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यामध्ये या मोहिमेचे चांगले स्वागत केले आहे. आगामी काळातही सायकल रॅलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अशाच सोशल विषयांवर मोहिमा राबविणार आहे.