मुंबई – राज्यभरात शेतकऱ्यांचा वाढता असंतोष, विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद या पार्श्वभूमीवर पायाखालची वाळू सरकल्यानेच विसंवादी राज्य सरकारने संवादयात्रा काढण्याची घोषणा केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्षयात्रेला संवादयात्रा काढून प्रत्त्युत्तर देण्याची घोषणा केली. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण बोलत होते. सरकारमधल्या लोकांना ग्रामीण भागाचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्नच समजत नाहीत. सरकारचा लोकांशी संवाद राहिला नाही. त्यामुळे सरकारवर संवादयात्रा काढण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात भाजपाच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. पण राज्यातले भाजपा सरकार कर्जमाफी देत नाही. त्यामुळे राज्यभरात सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. तूर खरेदी केंद्रे बंद करून सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. त्यातच रोज निय़म बदलून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खेरदी केंद्रे सुरू राहतील अशी घोषणा केली तर मुख्यमंत्र्यांनी मात्र, फक्त 22 एप्रिलपर्यंत केंद्रावर नोंदणी झालेली तूर खेरदी केली जाईल असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला तीन दिवस झाले तरी खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या तुरीचीही खरेदी सुरू झाली नाही. या सरकारच्या मंत्र्यांमध्ये आणि प्रशासनामध्येही संवाद राहिला नाही, हे जनतेशी काय संवाद साधणार, असा सवालही चव्हाण यांनी केला.