‘जनशक्ती’च्या माध्यमातून ‘महावीर वाणी’ मधुर ठरली

0

प.पू.युवाचार्य महेंद्रऋषी महाराज यांचे प्रतिपादन

उपसंपादक शरद भालेराव यांच्या पुस्तकरुपी संकलन भेट

नंदुरबार: देशभरासह राज्यात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले होते. अशातच शाळा, महाविद्यालये, सत्संग यांच्यावरही बंधने आली होती. मात्र, ऑनलाईनद्वारे सर्व उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना सोशल मीडियाच्या काळात उपयोगी ठरला. अशातच चातुर्मासच्या काळात जैन धर्मही मागे राहिला नाही. दै.‘जनशक्ती’च्या माध्यमातून जैन धर्मियांच्या अनुयायासह वाचकांपर्यंत ‘महावीर वाणी’द्वारे विचार पोहोचविले. यामुळेच ही ‘महावीर वाणी’ मधुर ठरली असल्याचे प्रतिपादन प.पू.युवाचार्य महेंद्रऋषी महाराज यांनी केले. दैनिक जनशक्तीचे उपसंपादक शरद भालेराव यांनी ‘महाविर वाणी’ चे 96 भागांचे पुस्तकरुपी संकलन केले आहे. पुस्तक भेटीप्रसंगी एमआयडीसीतील जैन भवनात ते बोलत होते.  यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण भंसाली, प्रमोद सिसोदीया, सचिन चोरडीया आदी उपस्थित होते.

पुस्तकरुपी संकलन करण्याची मिळाली प्रेरणा…!
जैन धर्मियांच्या अनुयायांसह असंख्य वाचकांनी संपर्क साधून दै.‘जनशक्ति’ मधून प्रकाशित झालेल्या ‘महावीर वाणी’चे कौतुक केले. त्यामुळे ही पुस्तकरुपी संकलन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यावरुनच ही मालिका प्रकाशित झाल्यानंतर मिळालेल्या विचारांमधून पुस्तकरुपी भेट देण्याचा निर्णय दै.‘जनशक्ति’चे उपसंपादक शरद भालेराव यांनी घेतला.

सर्वांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
‘महावीर वाणी’च्या संकलनातून पुस्तकरुपी संच तयार करण्यासाठी दै.‘जनशक्ति’चे संपादक कुंदन ढाके, निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी, वृत्त संपादक अमित महाबळ, वरिष्ठ उपसंपादक डॉ.गोपी सोरडे, चेतन साखरे, किशोर पाटील, प्रदीप चव्हाण तसेच संगणक प्रमुख तथा मुखपृष्ठाचे सजावट करणारे कैलास भावसार आणि प्रवीण भंसाली, हेमंत अत्तरदे, शरद महाजन अशा सर्वांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. महावीर वाणीचे हे विचार जैन अनुयायासह इतरांपर्यंतही पोहोचावे हीच, भेट देतांना अपेक्षा व्यक्त करुन 96 मालिकांची पुस्तकरुपी भेट प.पू.युवाचार्य महेंद्रऋषी महाराज यांना दिली. याबद्दल त्यांनी दै.‘जनशक्ति’च्या सर्व टीमचे कौतुक करुन आशीर्वाद देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.