जळगाव :- जलयुक्त शिवार अभियान हे भुमिपुत्रांसाठी नवसंजिवनी असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथील 1 कोटी 10 लाख रुपयांच्या नाला खोलीकरण व इतर कामांचे भूमिपूजन दि. 30 रोजी करण्यात आले. याप्रसंगी ना. पाटील बोलत होते.
कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत धरणगाव तालुक्यातील चांदसर, पिंपळे बु., महंकाळे, वाघळुद खु., हणुमंत खेडे, झुरखेडा-निमखेडा, पाळधी, बोरगाव बु., चोरगाव, एकलग्न, पोखरी व टहाकडी अशा 13 गावांमध्ये सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, व कंपार्टमेंट बंडीग व शेततळे अशा विविध कामांसाठी 5 कोटी 17 लाख 74 हजार रुपये ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर करण्यात आले आहेत. यात कंपार्टमेंट बंडींगची 23 गटांमध्ये 65 लाख 20 हजार, सिमेंट नालाबांधसाठी 1 कोटी 82 लाख 51 हजार रुपयांची 16 कामे, सिमेंट नालाबंध खोलीकरण 2 कोटी 66 हजाराची 17 कामे, नालाखोलीकरण विस्तार 77 लाख 85 हजार रुपयांची 23 कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे परिसरातील जमीन सिंचनाखाली येवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच पाणीटंचाई दूर होण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. वरील कामांच्या भुमिपुजन समारंभ याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. शेतकरी विकासासाठी हे अभियान यशस्वी करणे ही काळाजी गरज आहे. यासाठी लोकसहभाग तितकाचा महत्वाचा आहे. आपल्या परिसरात या कामांचा शुभारंभ झाल्याने आगामी काळात त्याचे चांगले परिणाम आपणा सर्वांना पहायला मिळतील असेही ना. पाटील म्हणाले.
यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, एकलग्न गावाचे सरपंच राजू बडगुजर, तहसिलदार कैलास कडलग, बीडीओ कल्पना वुईके तालुका कृषी अधिकारी ए.के.माळी, आर.बी.पवार, मंडळ कृषी अधिकारी देसले, उपसरपंच कमलबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भालेराव नवल पाटील ठेकेदार कोतवाल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.व्ही.सोंदाणे यांनी तर प्रास्ताविक ए.के.माळी यांनी केले.