जळगावचे स्वातंत्र्य सैनिक शिवाजी मराठे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

0

नवी दिल्ली । भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील ६ स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑगस्ट क्रान्ती दिनी सन्मान करण्यात आला. जळगावचे शिवाजी विठ्ठल मराठे यांचाही त्यात समावेश आहे.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात हा शानदार कार्यक्रम पार पडला. स्वातंत्र चळवळीत योगदान देणा-या देशाच्या विविध भागातील स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यातील मुंबई उपनगरचे जेठालाल अमृतलाल शाह, जळगावचे शिवाजी विठ्ठल मराठे, नागपूरचे पुंडलिक दौलतराव गेडाम, सोलापूरचे रघुनाथ रामचंद्र माने, यवतमाळचे प्रल्हाद कृष्णराव रेम्बे, चंद्रपूरचे श्रीराम पाडुरंग पाटील यांचा समावेश आहे.

पुण्याचे स्वातंत्र्य सैनिक बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमात उपस्थित होऊ शकले नाहीत. कार्यक्रमात इतर राज्य तसेच केंद्रशासीत प्रदेशातील स्वातंत्र्य सेनानींचाही सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक जेठालाल अमृतलाल शाह सध्या मुंबई उपनगरात राहतात, ते माहिती खात्याचे माजी उपसंचालकही आहेत. शाह यांनी भारत छोडोच्या आंदोलनात सक्रिय भाग नोंदविला आहे. महात्मा गांधीजींनी जेव्हा भारत छोडो आंदोलनाचा हुंकार दिला, त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यात लोकांना जागृत करण्यासाठी बैठका बोलावणे, मिरवणूक, मोर्चे काढण्याचे कार्य शाह यांनी केले. दोनदा इंग्रजांनी त्यांना पकडलेही होते. स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासात अहमदनगर जिल्ह्याच्या सरोश टॉकीज बॉम्ब केसची नोंद आहे. त्यात शाह यांचा सहभाग होता. भूमिगत राहून स्वातंत्र्य चळचळीत महत्वपूर्ण भूमिका निभावणारे अच्युत पटर्वधन यांनी त्यावेळी शाहांना त्यांच्या घरी ३ आठवडे आश्रय दिला होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांचा प्रश्न मोठा होता, त्यावेळी अहमनगर जिल्ह्यातील विसापूरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना आवश्यक घरगुती सामान वितरित करण्याचे कामही शाह यांनी केले आहे. १९५५ मध्ये जेव्हा गोवा मुक्ती संग्रामचा लढा सुरू झाला त्यातही शाह यांनी सक्रिय भूमिका निभावली. स्वातंत्र्यसैनिक पुंडलिक दौलतराव गेडाम हे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील थातुरवाडा येथील आहेत त्यांचा जन्म १० मार्च १९२४ चा आहे. जेव्हा गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा इशारा दिला, त्यावेळी श्री गेडाम हे ५ व्या वर्गात होते. मात्र, सर्वत्र स्वातंत्र्य लढ्याचे वातावरण होते, अशा वातावरणात आपली भूमिकाही सक्रिय असावी असे ठरवून त्यांनी या आंदोलनात उडी घेतली. त्यांचे काही वरीष्ठ आंदोलक तुरूंगात कैद होते त्यामुळे त्यांनी भूमिगत राहून काम पाहिले. इंग्रजांच्या काळात होणा-या परिक्षांना बहिष्कार घातला, भूमिगत असणा-या वरीष्ठ आंदोलकांना संदेश पोहोचविणे, स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत पोस्टर्स लावणे, अशा विविध भूमिका स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात त्यांनी निभावल्या आहेत.

स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ रामचंद्र माने हे क्रांतीसदन गुरूनगर अकलूज माळशिरस, जिल्हा सोलापूरचे आहेत. माने सध्या १०१ वर्षाचे आहेत. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना ९ माहिन्यांचा कारावास सोसावा लागला. हा कारावास त्यांनी सोलापूर, विजापूर आणि विसापूर येथे काढला. इंग्रजांनी त्यांना कारावासासह १०० रूपयांचा दंडही केला, हे पैसे वसूल करण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्या घरातील सामानाचा लिलाव करून हे पैसे वसूल केले होते. त्यांच्या स्वातंत्र्य लढयाची नोंद इतिहासाने घेतली आहे. १५ ऑगस्ट १९७२ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ताम्रपट देऊन त्यांचा सन्मान केला. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही सन्मानपत्र देऊन गौरव केला. आजही ते जनतेत स्वातंत्र्य आंदोलनाची गाथा ऐकवतात. स्वातंत्र्य सैनिक श्रीराम पाटील हे चंद्रपूरचे. त्यांचा जन्म १९२८ चा आहे. वयाच्या १४ व्या वर्षी महात्मा गांधीच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नंतर दहावीची परीक्षा मध्येच सोडून त्यांनी सैन्यामध्ये भरती होणे पसंत केले आणि देशसेवेला प्रथम प्राधान्य दिले.

स्वातंत्र्य सैनिक प्रल्हाद कृष्णराव रेंभे हे यवतमाळचे आहेत. ९ ऑगस्ट १९५५ ला ६ स्वातंत्र्य सैनिकांसह १० ऑगस्ट १९५५ ला पुण्याच्या केसरी कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक लोकनायक बापूजी अने यांची भेट घेतली. १४ ऑगस्टला ५७० स्वातंत्र्य सैनिकांसह ते कुमकुमबाई येथे पोहोचले. १५ ऑगस्ट १९५५ ला सकाळी ते प्रताप सिंग राणे यांच्या घरी पोहोचले. तिथे स्वातंत्र्य सैनिकांना पोर्तुगीज सरकारने कैद करून त्यांना मारहाण केली आणि नदीत फेकून दिले. अशा प्रकारे पाटील यांनी गोवा मुक्ती संग्रामात महत्वपूर्ण भूमिका निभावली.

मराठे यांचा गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग
स्वांतत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे हे जळगावचे आहेत. गोवा मुक्ती संग्राममध्ये मराठे हे सहभाग नोंदविला आहे. दिवंगत स्वातंत्र्य सैनिक देवराम रामजी पाटील यांच्या नेतृत्वात ३० सत्याग्रही पुण्याकडे निघाले होते, त्यात मराठे यांचा समावेश होता. मराठे यांनी दिवंगत स्वातंत्र्य सैनिक जयवंतराव टिळक यांना आपण आपल्या पत्नीसह गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होत असल्याचे लेखी दिले होते. स्वातंत्र्य सैनिक आणि दिवंगत माजी अर्थमंत्री मधु दंडवते, मराठे यांच्यासह ३० सत्याग्रही बेलगाम, सांवतवाडी, अर्नोडा वरून १७ ऑगस्ट १९५५ ला गोव्यात दाखल झाले, पोर्तुगीजांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. मराठे यांच्या पायांना, खांद्यावर, पाठीवर जखमा झाल्या, अशा प्रकारे मराठे यांचा गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग होते.