जळगाव : एलआयसी कार्यालयातील शाखा प्रबंधकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी दिड लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शहरातील रायसोनी नगरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
प्रकाश भीमरावजी बांगर (53, जे.के.इंग्लिश मेडीयम, रायसोनी नगर, जळगाव) हे भास्कर मार्केटमधील एलआयसी कार्यालयात वरीष्ठ शाखा प्रबंधक आहेत. गुरुवार, 14 एप्रिल रोजी दुपारी ते पत्नी, मुलगा व सुन यांच्यासह नागपूर येथील त्यांच्या मूळ गावी गेल्याने बंद घर चोरट्यांना पर्वणी ठरले. रविवार, 24 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता बांगर हे जळगावातील रायसोनी नगरातील घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
दिड लाखांचा ऐवज लंपास
चोरट्यांनी कपाटातून चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानातले टॉप्स, नथ व चांदीचे पैंजण मिळून एक लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवार, 25 एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिसात त्यांनी धाव घेवून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.