जळगावात 36 वर्षीय तरुणाची आत्महत्या

जळगाव : व्यवसायासाठी घेतलेल्या उसनवारीचे पैसे परतफेड होत नसल्यामुळे नैराश्यात आलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आली. गणेश भिका बोरसे (36, रा. सदोबानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
मूळचे धरणगाव तालुक्यातील रवंजे येथील गणेश बोरसे हे कामानिमित्त सदोबानगरात आले होते. भाड्याने खोली घेवून ते पत्नीसह राहत होते. त्यांनी मोबाइल, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान टाकले होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. दुकान टाकण्यासाठी त्यांनी काही जणांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड होत नसल्यामुळे काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. 15 रोजी घरी कुणीच नसतांना त्यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी नितीन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.