जळगाव: शेतकर्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळावे याकरीता राज्यातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील निम्नतापी प्रकल्प, पद्मालय सिंचन प्रकल्प, बलुन बंधारे शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे प्रकल्पाची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे आयोजीत बैठकीत दिले. दरम्यान शेतकर्यांना पीकांना पाणी देतांना होत असलेला त्रास लक्षात घेता उर्जा विभागाने कृषीपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, आमदार चंदुलाल पटेल, चिमणराव पाटील, किशोर पाटील, सुरेश भोळे, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव भूषण गगराणी, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, उर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री सगणे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, तापी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदिंसह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा संकुलांसाठी निधी देणार
जळगाव जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून चाळीसगाव येथील कत्तलखान्याची चौकशी करुन अहवाल सादर करावा, चाळीसगाव-मालेगाव रस्त्यांची दुरुस्ती एक महिन्याच्या आत करण्यात यावी. चाळीसगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत बांधण्यास मंजूरी देण्याबाबत कार्यवाही करावी,कॅश सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित विभागांना यावेळी दिल्यात.अमळनेर येथील रुग्णालयाचा दर्जोन्नती करणास मान्यता देण्याबरोबर जळगाव बायपास जाणार्या शेतकर्यांना मोबदला देण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच महानगरपालिका व नगरपालीकांना एलईडी लाईट पुरविण्यास केंद्र शासनाने एकच एजन्सी नेमली असल्याने येणार्या अडचणी लक्षात घेता लाईटचा वेळेवर पुरवठा होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन एजन्सीशी करण्यात आलेल्या कराराचा आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी उर्जा सचिवांना दिलेत.
आमदारांनी मांडले प्रश्न
बैठकीत आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची, अंजनी प्रकल्पाची उंची वाढविण्याची, तापी खोर्यातील गुजरातला जाणारे पाणी अडविण्याची, आमदार किशोर पाटील यांनी वन्यजीवांमुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची, क्रीडा संकुले पूर्ण करण्याची, मंगेश चव्हाण यांनी कत्तलखाना बंद करणे, चाळीगाव -मालेगाव रस्ता दुरुस्ती, कृषी विभागातील रिक्त पदे भरणे, आमदार अनिल पाटील यांनी नदीजोड प्रकल्प राबविणे, अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, दगडी दरवाजा दुरुस्ती, लताताई सोनवणे यांनी धानोरा येथील सबस्टेशन उभारणी, तापी नदीवर दुसरा पुल बांधणे, जात पडताळणी कार्यालय धुळे येथे सुरु करणे, आमदार राजूमामा भोळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून घरे उभारणे, जळगाव शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर करणे, जळगाव शहरातील विशेष निधीतून होणार्या कामांची स्थगिती उठविणे, तर आमदार चंदूलाल पटेल यांनी जळगाव शहरास जोडणार्या बांभोरी पुलास पर्यायी पुल तयार करण्याची मागणी बैठकीत केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन त्या सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सुचना दिल्या.