जळगाव। शनिवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. अखेर सायंकाळी 6 वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली होती. शहरात रात्री 8.30 नंतर जोरदार वारा वाहण्यास सुरुवात झाली. वार्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. वार्यामुळे शहरातील काही भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता. 15-20 मिनीटे रिमझिम पाऊस सुरु होता. सायंकाळची वेळ घरी परतण्याची असल्याने अचानक सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहर परिसर वगळता इतरत्र काही ठिकाणीही पावसाने हजेरी लावली. वार्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडाल्याने वाहन चालकांना अडचणी आल्या.
मान्सूनपूर्व घन दाटुनि आले…?
मुंबई । महिनाभर कुठे ना कुठे आकस्मिकपणे हजेरी लावणार्या पावसाने व गारपीटीने विविध पीकांचे नुकसान केले असून शुक्रवारी सायंकाळनंतर नवी मुंबई, रायगड भागात वीजेच्या लपंडावासह पावसाने हजेरी लावली. याकाळात नागरीक नि विशेषत: चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळीचा फटका काही ठिकाणी तीव्र स्वरुपात जाणवला असून सांगली जिल्ह्यातील वडगाव येथे साडेचारच्या सुमारास वीज पडून शंकर कोंडी पाटील (60) आणि अरविंंद राजाराम बिसले (45) हे शेतमजूर मृत्युमुखी पडले.
साईभक्तांचीही पावसामुळे धावपळ
नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या साईभक्तांचीही पावसामुळे धावपळ झाली. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्गला वादळाचा तडाखा बसला. घोटगे-परमे पंचक्रोशीत हजारो केळीची झाडे जमीनदोस्त झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही शनिवारी जोरदार पाऊस झाला. बीडमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील विविध भागांत विजांसह पाऊस पडला. दरम्यान, .15आणि 16 मेरोजी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खोपोलीत शनिवारी सकाळी 8 वा. अवकाळी पावसाने धो धो बरसत खोपोली करांना चांगलेच झोडपुन काढले. सकाळी पडलेल्या पावसाने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.