जवाब दो मोहिमेद्वारे राष्ट्रवादीने केले सरकारला लक्ष

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर सुरु केलेल्या जवाब दो मोहिमेमध्ये सत्ताधारी भाजपच्या आमदारांसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. सत्ताधारी आमदार थेट मानवी तस्करीमध्ये सहभागी आहेत का असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आज #जवाबदो या हॅशटॅगअंतर्गत राज्यामधील मुलींच्या अपहरणाची वाढती संख्या आणि मानवी तस्करीसंदर्भात प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून आज यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये राष्ट्रवादीने सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नच चिन्ह उपस्थित करताना मुंबईमधील २२६४ मुली बेपत्ता असून हे महाराष्ट्राच्या गृहखात्याचे अपयश आहे का असा सवाल केला आहे. ट्विटमध्ये राष्ट्रवादीने, ‘मुंबईतील २२६४ मुली बेपत्ता आहेत. मानवी तस्करीला आळा घालण्यास महाराष्ट्राचे गृहखाते सपशेल अपयशी ठरले आहे काय? मुलींच्या अपहरणाबाबत महाराष्ट्र अव्वल स्थानावर का? या उद्योगात सत्ताधारी पक्षाचे आमदार सामील आहेत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हॅण्डल टॅग केले आहे.

माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार, विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, नवाब मलिक, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हेमंत टकले, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे, सचिन अहीर यासारख्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या अकाऊण्टवरून सारखेच ट्विट करण्यात आले आहे. ४ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेमधील सरकारला राष्ट्रवादीने विचारलेला हा दहावा प्रश्न आहे.

काय आहे #जवाबदो मोहिम

‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ या टॅग लाईनसह ‘जवाब दो’ म्हणत विरोधकांनी सोशल मीडियावर सत्ताधारी भाजपाविरोधात मोहिम उभी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जबाव दो नावाने नवीन मोहिम सुरू केली असून ४ सप्टेंबरपासून रोज एक प्रश्न सोशल मिडियावरून विचारला जात आहे.

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तेत असलेल्या भाजपाला लक्ष करण्यात विरोधक कोणतीही कसर सोडताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर संघर्ष यात्रा आणि मेळावे घेतले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियाद्वारे ‘जवाब दो’ या नव्या आदोंलन पुकारत भाजपाला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियाचा वापर करत निवडणूक जिंकली होती. आता तेच शस्त्र वापरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कचाट्यात पकडण्याचे काम करत आहेत.