जामनेर तालूक्यातील 15 गावातून ‘लोकनियुक्त सरपंच’ निवड होणार

0

जामनेर । तालूक्यातील 15 ग्रामपंचायतीची मुदत ऑक्टोंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत संपत असून या गावातील नागरीकांना आता निवडणूकीचे वेध लागले आहेत. निवडणूक आयोगा मार्फत या गावांमधील वार्ड रचना व आरक्षणाचे काम पूर्ण झालेले असून यात कभी खुशी कभी गम अशी स्थिती झाली आहे. गावातील हौशे तरूण कार्यकर्त्यांनी आता पासूनच गुडघ्याला बाशींग बांधून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी करतानाच दिसून येत असून मुख्य पक्षाकडून उमेदवार चाचपणीला सुरूवात झालेली आहे.

लोकनियुक्त सरपंचपदासाठी उत्सुकता
पळासखेडे बुद्रूक, चिंचखेडे बुद्रूक, हिंगणे बुद्रूक, टाकळी बुद्रूक, खादगाव, करमाड, मालदाभाडी, सोनारी, रांजणी, मोहाडी, टाकळी खुर्द, कोदोली, चिलगाव, नांद्राहवेली, सवतखेडे यांचा समावेश आहे. या गावांमध्ये येत्या निवडणूकी पासून सरपंचपद हे थेट जनतेमधून निवडून येणार असल्याचे राज्य शासनाने नुकतेच जाहिर केले असून या निर्णयाबाबत मतदारांमध्ये सभ्रंम निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ ज्या ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य आहेत त्यातूनच 1 सदस्य सरपंचपदासाठी उमेदवारी करेल कि दहावा सदस्य हा उमेदवारी करेल हे स्पष्ट होत नसल्यामुळे लोकनियुक्त सरपंच पदासाठी नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

घोडे बाजाराला बसणार लगाम
या अगोदर निवडूण आलेल्या सदस्या मधूनच सरपंच निवडला जायचा ज्या पक्षाच बहूमत जास्त त्याच पक्षाचा सरपंच व्हायचा. बहूमत सिध्द करण्यासाठी वेळेवर सदस्याची पळवा पळवी केली जात होती. त्यातून आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार होऊन घोडे बाजार व्हायचा. परंतू लोकनियुक्त सरपंच निवडीचा निर्णय घेऊन शासनाने या घोडे बाजाराला जणू काही लगामच लावल्याचे दिसून येत आहे.