जिल्हा आत्महत्त्याग्रस्त होईपर्यंत वाट पाहू नका

0

मुंबई : शेतकरी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शिवसेनेची मागणी आहे की, शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे. आत्महत्त्याग्रस्त जिह्यासाठी मदत द्या, अशी बातमी वाचली. एखादा जिल्हा आत्महत्त्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मीरा-भाईंदरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा मातोश्री, या ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश झाला. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. पण, शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे. हे इतके ताणले जाण्याची गरज नव्हती. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल घेतली गेली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही, असा कारभार केला पाहिजे. मला तशी अपेक्षा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेलचे भाव खाली आले असले तरी आपल्या देशात दर खाली आले नाहीत. देशात जर समान कर लावणार असू तर देशभरात दर पण समान असायला हवेत. इतर राज्यात ते आपापल्या सोयीने दर लावतात, त्यामुळे दरवाढ होते. समान कर असेल तर दर पण समान असले पाहिजे. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकल जात असेल तर ते चूक आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मनापासून राष्ट्रपती पदासाठी सुचवले आहे. शरद पवार यांच्या बाबतीत म्हणायचे तर ते मोदी यांचे गुरू आहेत, असे मोदी यांनी सांगितले आहे. त्यांना पद्मविभूषणही दिले. मला माहित नाही कुणाच्या मनात काय येईल? एकमेकांची मने जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको? हिंदूराष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच लायक का नसावेत? राज्यपालांच्या नेमणुका पाहा. इतरत्र ठिकाणी आरएसएस कार्यकर्त्यांची नेमणूक करतो. मग देशाचे नेतृत्त्व त्यांनी करायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी केला. नारायण राणे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाबाबत आपण बोलणार नाही. त्या दोघांनाही शुभेच्छा, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावरचे आपले भाष्य टाळले.