जिल्हा कारागृहातील बंदीनी केला अवयवदानाचा संकल्प

0

बंदी सचिन गुमानसिंग जाधव रांनी भरुन दिले अवयवनदान संमतीपत्र

‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्यानिमित्ताने जिल्हा कारागृहातील बंदीजनांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती

जळगाव । राज्यात महा अवयवदान महोत्सव सुरु असून या महोत्सवाच्या निमित्ताने येथील जिल्हा कारागृहातील बंदी सचिन गुमानसिंग जाधव याने मृत्युपाश्‍चात अवयवनदान करण्याचे संमती पत्र जिल्हा कारागृह अधिक्षक सुनिल कुवर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेकडे भरुन दिले. आणि उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात त्याच्या या धाडसाचे कौतूक केले. निमित्त होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरु असलेल्या महा अवयवदान जनजागृती अभियानाचे. जिल्हा सामान्य रुग्णालय, व जी. एम. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कारागृहातील बंदीजनांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जी. एम. फाउडेशन जिल्हयात विविध आजारांच्या रुग्णांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत असते. समाजात सध्या अनेक रुग्ण अवयवाअभावी व्याधीग्रस्त जीवन जगत आहे. त्यांना नवीन जीवन मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून जी. एम. फाऊडेशनच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज बंद्यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. हे या अभियानाचे यश असल्याचे प्रतिपादन जी. एम. फाऊंडेशनचे अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले.

मृत्युनंतरही जिवंत रहायचे असेल तर अवयवदान करा
यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा कारागृह अधिक्षक सुनिल कुवर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जी. एम फाऊडेशनचे अरविंद देशमुख, आरोग्य दीप किडनी फाउंडेशनचे डॉ. शशिकांत गाजरे, अयाज मोहसीन, सागर महाजन आदि उपस्थित होते. अवयवदानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले की, शरीर हे नष्ट होणारे आहे. मृत्युनंतरही अवयवरुपी जिवंत रहायचे असेल तर अवयवदान केले पाहिजे. यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. अनेक नागरीकांना आपण शरीराचे कोणते अवयव कधी दान करु शकतो हेच माहिती नसते. यासाठी शासनाने जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानाची जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जनजागृती होत असल्याचे सांगून अवयवदानाबाबत सविस्तर माहिती दिली.

बंदी हा कधीही वाईट नसतो
बंद्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण वेगळा आहे. असे सांगून जिल्हा कारागृह अधिक्षक सुनिल कुवर म्हणाले की, बंदी हा कधीही वाईट नसतो तर त्यांला परिस्थिती वाईट बनवित असते. कारागृहाच्या माध्यमातून बंद्यांमध्ये समाजातील जीवन शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी याठिकाणी प्रयत्न केले जातात. कारागृहात येताना बंदी हा गुन्हेगार म्हणून जरी येत असला तरी येथून बाहेर जाताना तो समाजाचा जबाबदार घटक म्हणून बाहेर जात असतो. त्यामुळे बंद्यांनी कोणताही न्युनगंड न ठेवता आपणही समाजाचेच घटक आहोत असे समजून वागावे. कारागृहात आल्यानंतर त्यांच्यात निश्‍चित बदल होत असतो. याचे उदाहरण म्हणजे बंद्यांनी आज केलेला अवयवदान संकल्प होय. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी आज हा संकल्प करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचेही श्री. कुवर यांनी सांगितले.

बंदीनी भरले संमतीपत्र
अवयवदानाचे महत्व, अवयवदानाबद्दलची कारणमिमांसा आणि अवयवदानाच्या सविस्तर माहितीचे सादरीकरण डॉ. शशिकांत गाजरे यांनी केले. तसेच बंदीजनांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. यावेळी अयाज मोहसीम यांनी बंदीजनाना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.अवयवदान जनजागृती कार्यक्रमानंतर अनेक बंद्यांनी अवदान करण्याचा संकल्प केला. प्रातिनिधीक स्वरुपात बंदी सचिन गुमानसिंग जाधव याने अवयवनदान संमती पत्र भरुन दिले. यावेळी उपस्थित बंद्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञेचे वाचन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले. यावेळी बंद्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्ञानेश्‍वर पांढरे, आनंदा पाटील यांच्यासह जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व बंदी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सागर महाजन यांनी मानले.