गावातील 400 कुटुंबांना धान्याचे केले वाटप
रावेर : हातावर पोट असणार्या गरीब जनतेसाठी तांदलवाडीत जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी त्यांच्यासाठी आपले धान्याचे गोडावून उघडून गावातील सुमारे चारशे कुटुंबाना धान्य वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या या कार्याचे समाजमनातून कौतुक होत आहे. कोरोना या महामारीमुळे गाव ते थेट मेट्रो सिटीपर्यंत संपूर्ण लॉकडाउन आहे. तांदलवाडी गावात सुध्दा संचारबंदी असून गावातील काही कुटुंब ज्यांच्या हातावर पोट आहे अश्याच्या घरात धान्य संपल्याची वार्ता जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले गहू गावातील गरीब जनतेला प्रत्येकी पाच-ते-सात किलो प्रमाणे वाटप केले. तालुक्यात एखाद्या राजकीय व्यक्तीकडून धान्य वाटपाची ही पहिलीच वेळ आहे. इतरही लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.