राहुरी । अहमदनगर – मनमाड महामार्गावर राहुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर दोघांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हारकडून राहुरीकडे येणारी स्कॉर्पिओ गाडी महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. दुचाकीस्वाराला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही स्कॉर्पिओ सरळ झाडावर आदळली. यात सहाजण जागीच ठार झाले. या अपघातात अरुण थोरात, महेश पवार, सुरेश खुळे, महेश कोळपे, नाथा डमाळे, सतीष शेळके, सचिन ढगे, सतीष गोसावी अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
यातील सचिन ढगे हे राहुरी तालुक्यातील वरंवडी गावचे सरपंच आहेत. तर उर्वरित सर्व जण राहुरी तालुक्यातील वळण येथील रहिवासी आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की झाड मोडून पडले आणि गाडीने चार पलट्या घेतल्या. ही स्कॉर्पिओ नवीनच शोरुममधून घेतली होती. त्यावर पासिंग क्रमांक टाकण्यात आलेला नव्हता. या गाडीवर एमएच 16, पीसी 192 असा शोरुमचा तात्पुरता क्रमांक टाकलेला होता.