कोणत्याही परिस्थितीत आपली मनःस्थिती स्थिर ठेवा!
राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज यांनी केले मार्गदर्शन
चिंचवडः मनुष्य जीवन अनेक चढ उतारांनी भरलेले असते. परमेश्वर जीवन देतो, ते कसे जगायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. तरीही आज प्रत्येकजण संपत्ती व त्यातून मिळ्णार्या खोट्या प्रतिष्ठेसाठी धावत असतो. मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती मिळेल की नाही, हे कोणी सांगू शकत नाही. परंतु जीवन जगताना चांगले आचरण, सकारात्मक विचार ठेवल्यास आपण आहोत तिथेच स्वर्ग निर्माण करू शकतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात अधिकाधिक सहजता आणावी. जे मिळाले आहे, त्यासाठी देवाचे आभारी रहा. कोणत्याही परिस्थितीत आपली मनःस्थिती स्थिर ठेवा. तुमचे स्वतःचे व तुमच्या सान्निध्यात असलेल्या प्रत्येकाचे जीवन स्वर्गासारखे होईल, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज यांनी केले.
चिंचवड गाव येथील जैन मंदिर प्रांगणात आयोजित सत्संग कार्यक्रमात ‘जीवन को स्वर्ग कैसे बनाए’ या विषयावरील प्रवचनावेळी राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज बोलत होते. राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज व राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज सत्संगानिमित्त चिंचवडला आले असून पहिल्या दिवशी प्रवचनाला अलोट गर्दी झाली होती. या प्रवचनाच्या शुभारंभ प्रसंगी आर. बी. ओसवाल, दिलीप नाहर, हेमंत गूगले, अजीत लूणिया, अमित कटारिया, रोहित बलगट, भूषण संचेती आदी उपस्थित होते. सत्संग सोहळ्यात पहिल्याच दिवशी अहिंसा चौक येथे सकाळी राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज, राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज, डॉ. शांतीप्रियजी महाराज यांचे येथे चिंचवडगाव जैन मंदिर भव्य शोभायात्रेने आगमन झाले. शेकडो भाविकांनी उत्साही वातावरणात त्यांचे सहर्ष स्वागत केले.
विचार चिरकाल रहातात
जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी प्रत्येकाने आपले आचरण, चारित्र्य, विचार कसे ठेवावेत याबाबत राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज यांनी अनेक उदाहरणे देत अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. मनुष्याचा चेहरा सुंदर नसला तरी चालेल, त्याचे चारित्र्य सुंदर असावे. शरीराचे सौंदर्य चिरकाल नसते. माणसाचे विचार चिरकाल राहतात. सौंदर्याला काही काळ सन्मान मिळेल पण श्रध्दा चांगल्या चारित्र्यालाच मिळते. भगवान महावीरांना आपण कोणीही प्रत्यक्षात पाहिलेले नाही. परंतु त्यांचे विचार आज आज हजारो वर्षांनीही कायम आहेत. महावीरांसह अनेक महान विभुतींच्या जीवनात अडचणी, संकटे आली. पण त्यांनी परिस्थिती बदलली तरी स्वतःची मनःस्थिती बदलली नाही. ही शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी. त्यामुळे आपल्याला दुःख होणार नाही.