नवी दिल्ली: काल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली. त्यानंतर उपराष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शपथ घेताना फक्त शपथ वाचा इतर नवे घेऊ नका असे सांगितले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान झाल्याची भावना व्यक्त होता आहे. दरम्यान स्वत: उदयनराजे भोसले यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “सभागृहात जे झालेच नाही त्यावरून राजकारण सुरु आहे, व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतलेला नाही, ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना नायडू यांनी समज दिली” असे सांगितले. शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करणे बंद करा असे आवाहन त्यांनी केले आहे.
“मी शपथ घेतली, मी सांगतो आहे असे काहीही झालेले नाही. छत्रपतींचा अपमान झाला असता आणि मी गप्प बसलो असतो का? गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना माहिती आहे. छत्रपतींचा अपमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता” असे ठामपणे उदयराजे यांनी सांगितले आहे.
मी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता व्यंकया नायडू यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त घेतलेली शपथ जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितले”.
शिवसेनेवर टीकास्त्र
उपराष्ट्रपती यांनी छत्रपतींचा अपमान केल्याची टीका शिवसेनेने केली आहे. संजय राऊत यांनी याबाबत भाजपला लक्ष केले आहे. यावर देखील उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत एक महान व्यक्ती असल्याचा टोला लगावला. आपल्याकडे महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागणारे असे म्हणत आहे हे आश्चर्यचकित करणारे आहे असेही ते म्हणाले आहेत. शिवसेनेने त्यांच्या पक्षाच्या नावासमोरील शिव हे नाव काढून ठाकरेसेना करावे असा सल्लाही उदयनराजे यांनी दिला.