वयाच्या 88 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : कथा, कविता, ललित लेखन, बाल साहित्य, नाटक या सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये मुक्त संचार करणार्या शिरीष पै यांचे शनिवारी मुंबईत राहत्या घरीच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्या सुप्रसिद्ध लेखक आचार्य प्र. के. अत्रे यांच्या कन्या होत्या. सायंकाळच्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पै यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1929 रोजी झाला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकू हा प्रकार रूजविण्याचे श्रेय शिरीष पै यांना जाते. याशिवाय, इंग्रजी आणि मराठीतून अनेक पुस्तके आणि नाटके त्यांनी लिहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
आचार्य अत्रेंकडून बाळकडू
शिरीष पै यांनी आचार्य अत्रे यांच्या मराठा या वृत्तपत्रातून पत्रकार म्हणूनही काम केले होते. हायकू हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत रूजवला. आचार्य अत्रे यांच्याकडून त्यांना बाळकडू मिळाल्याने त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांनी समाजसेवादेखील केली.
साहित्यविश्वात हळहळ
शिरीष पै यांचे एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र हे आणि असे अनेक कवितासंग्रह वाचकांनी डोक्यावर घेतले आहेत. लाल बैरागीण, हेही दिवस जातील या कादंबर्यांचे लेखनही त्यांनी केले आहे. आईची गाणी, बागेतील जमती या बालसाहित्यांची निर्मिती त्यांनी केली. शिरीष पै यांच्या लेखनाची एक स्वतंत्र शैली आहे. त्यांच्या या शैलीमुळे वाचकांना कायमच आनंद मिळाला आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होते आहे.