झारखंडमध्ये चकमक; तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

0

गिरिदीह – झारखंडच्या गिरिदीह येथे आज नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफ जवानांना यश आले आहे. दरम्यान यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये नक्षलवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक झाली आहे. सीआरपीएफच्या 7 बटालियनने बेलभा घाट येथील जंगल परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरू केले होते. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सीआरपीएफ जवानांनी चोख उत्तर देत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपाचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता, तर चार जवान शहीद झाले होते.

सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये 26 मार्च रोजी चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला होता. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.