मुंबई । पवई तुंगा व्हिलेज येथील पाइपलाइन लगतच्या झोपड्डीधारकांवर मुंबई महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी झोपडीधारक, दुकानदार आणि रहिवाशांचे प्रश्न सोडवणे आवश्यक असून त्यांचे पुर्नवसन करताना त्यांची बाजू समजून घेणे महत्वाचे आहे. झोपड्डीधारकांवरील कारवाई स्थगित करावी याकरिता स्थानिक नगरसेविका अश्विनी माटेकर यांच्या माध्यमातून अशोक माटेकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची प्रत महापालिकेला सादर करण्यात आली आहे.
कारवाई स्थगित करण्याची मागणी
मुंबई शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणार्या जलवाहिन्यालगत उभारण्यात आलेल्या झोपड्या उच्च न्यायालयाने हटविण्याचे आदेश दिले आहेत घाटकोपर परीसरातील जलवाहिनी लगतची कारवाईनंतर पवई तुंगा व्हिलेज साकीनाका येथील जलवाहिन्या मोकळ्या करण्याकरिता कुर्ला एल विभागाने नोटीस बजावली आहे. न्यायालयाने महापालिकेला 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. प्रभाग क्रमांक 156 मधील मिलिंद नगर, उदय नगर साकिनाका परिसरातील झोपड्यांवर
महापालिकेची कारवाई होत आहे.
झोपडीधारकांकडे सन 2000 ची सर्वेक्षण पावती असताना देखील शेकडो झोपडधारकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या झोपडीधारकांनी 2000 पूर्वीची कागदपत्रे महापालिकेकडे सादर केली आहेत. पालिकेने अनेकांना अपात्र केलेल्या झोपडीधारकांची बाजू समजून घेणे आवश्यक आहेत. सध्या शाळा सुरु आहेत वार्षिक परिक्षा झाल्यानंतर पुर्नवासनाबाबत कारवाई करावी तूर्तास ही कारवाई स्थगित करण्यात यावी याकरिता अशोक माटेकर यांच्या सूचनेनुसार सहकारी स्वप्नील धुरी यांनी जनहित याचिका केली आहे.
20 नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी
या जनहित याचिकेची प्रत महापालिकेला सादर केली आहे. येथील झोपडीधारक रहिवाशांना एच डी आय एल कुर्ला कमानी येथे पुनर्वसन करण्यात यावे या करिता नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे पाठपुरावा केलेला असून झोपडीधारकांना तीन किलोमीटर अंतराच्या आत पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. सोमवार, 20 नोव्हेंबर 2017 रोजी या जनहित याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.