वर्षपूर्तीनिमित्त दिली पाणीपट्टी दरवाढ भेट
पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करून टँकरमुक्त करून दाखविण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्ष सोयीस्कर रित्या विसरले आहेत. वर्षपूर्ती झाल्याबद्दल भाजपने नागरिकांना चारपट पाणीपट्टी दरवाढीची भेट दिली आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. पारदर्शक कारभार करीत असल्याच्या फुशारक्या मारणार्या भाजप पक्षाने आपल्या भ्रष्टाचाराचा अधिभार जनतेवर लावू नये. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून याला तीव्र विरोध करेल, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस पार्टीच्यावतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला. पाणीपट्टी दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षातर्फे निर्दशने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अल्पसंख्याक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैसवाल, एनएसयूआय शहराध्यक्ष विशाल कसबे, ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, मॅन्युअल डिसुजा आदी उपस्थित होते.
महाग पाणी पुरवठा
सचिन साठे पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका आतापर्यंत देशात सर्वांत कमी दराने पाणीपुरवठा करीत होती. सत्ताधारी पक्षाने लादलेल्या या दरवाढीमुळे आता देशातील सर्वात महाग पाणी पुरवठा ठरला आहे. पाच हजार तीनशे कोटींपेक्षा जास्त रुपयांचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. 405 कोटीच्या निविदा प्रक्रियेत 34 कोटींची बचत केल्याचा अजब दावा आयुक्तांनी केला आहे. वाचवलेली ही रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च करावी व नागरिकांना सुविधा द्यावेत. दरवर्षी पाणीपट्टीतून सत्तर कोटींहून जास्त रुपये महापालिकेत जमा होतात. तरीदेखील पाणीपट्टीची दरवाढ नागरिकांवर लादली आहे.
बहुमतामुळे मनमानी कारभार
साठे म्हणाले की, भरघोस आश्वासने देऊन मागील निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजपाने एक वर्षाच्या कार्यकालात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पाशवी बहुमतामुळे भाजपामध्ये मनमानी कारभार करीत आहे. मात्र या सत्ताधार्यांची मनमानी ऐकून घेतली जाणार नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. पाशवी बहुमतापुढे निषप्रभ ठरलेल्या विरोधी पक्षामुळे पिंपरी-चिंचवडच्या जनतेवर चौपट पाणीपट्टी दरवाढ भाजपाने लादला. दिशाभूल करणारी आकडेवारी सादर केली.