मुंबई । देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून कार्यकरत असलेल्या टाटा मोटर्समध्ये कंपनी अंतर्गत व्यवस्थापनात नवे फेरबदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नव्या फेरबदलानुसार कंपनीतील सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, यापूढे कंपनीत कोणीच वरिष्ठ व कनिष्ठ असणार नाही. कर्मचार्यांना आपल्या गुणवत्तेस वाव देण्यात यावा यासाठी कंपनी हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे टाटा मोटर्समध्ये यापूडे बॉस प्रणालीला गुडबाय केले जाणार आहे. संभाव्य नव्या बदलामुळे टाटा मोटर्समध्ये पदांच्या बाबतीत का होईना साम्यवादाचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे.
समूह कार्याला (टीम वर्क) वाव मिळावा तसेच, कर्मचार्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य मिळावे यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते. सुमारे दहा हजार कर्मचार्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयानुसार कोणताही कर्मचारी बॉस, वरिष्ठ अथवा कनिष्ठ असणार नाही. सर्व कर्मचारी एकाच स्तरावर असतील. तसेच, प्रत्येक विभागात एक लीडर असेन. त्या लीडरला हेड असे संबोध़ण्यात येईल. त्याच्या नावासमोर व्यक्तीचे नाव आणि कामाचा किंवा डिपोर्टमेंटचा उल्लेख असेल.
14 पदांची संख्या केवळ पाचवर
एका पत्रकाद्वारे कंपनीने हा निर्णय कर्मचारी आणि अंतर्गत व्यवस्थापनास कळवल्याचे समजते. या निर्णयानुसार टाटा मोटर्सकडून जनरल मॅनेजर, सीनिअर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही पदे लवकरच बरखास्त करण्यात येतील. त्यामुळे कंपनीत यापुढे कोणीही बॉस नसेल आणि सर्व जण केवळ कर्मचारी म्हणूनच ओळखले जातील. या निर्णयामुळे सध्याच्या 14 पदांची संख्या पाचवर येईल.
सर्व्हिस एजन्सी संस्कृती वाढणार
बहुराष्ट्रीय कंपन्या विशेषत: सर्व्हिस एजन्सीजमध्ये सर्व कर्मचारी समान या तत्वांवर काम चालते. इथे कोणी बॉस असत नाही. असते ते टीम वर्क. या निर्णयामुळे टाटा मोटर्समध्येही सर्विस एजन्सी संस्कृती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा निर्णय कर्मचार्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल. यापूर्वी कर्मचारी काम करत असताना पदांवर लक्ष ठेवत असत. त्यामुळे त्यांचे काही प्रमाणात कामाकडे दुर्लक्ष होत असे. आता पुन्हा कर्मचारी आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करतील, असा विश्वास टाटा मोटर्सने व्यक्त केला आहे.