टाळ-मृदंगाच्या गजरात पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विठुरायाकडे साकडं

पंढरपूर  : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटवू दे, वारकऱ्यांनी डूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीत ट्विट

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा.  सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी  विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच प्रादेशिक अस्मिता जपतात. देशातील नागरिकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात आपुलकीने आपलसं करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी आणि वारकऱ्यांची शिकवण मोदींनी जगाला सांगितली आहे.