पुण्यात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ‘रंगारी विरुद्ध टिळक’ या वादाला जो रंग दिला जातोय, तो बरोबर नाही. कारण त्यातून जुन्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचं भूत पुन्हा डोकं वर काढतंय. ते सर्वथा गैर आहे. अगोदरच पुणे शहराला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची मोठी पार्श्वभूमी आहे. ब्राह्मण समुदायाला ‘देशाचे दुश्मन’ म्हणून पुस्तकरूपानं मांडून चळवळ करणारे दिनकरराव जवळकर हे पुण्यातलेच. या वादाचं नेतृत्व करणारे केशवराव जेधे हेही पुणेकर. ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकाचा वाद एवढा चिघळला की, पुढे त्यातून मारामार्या झाल्या. हा वाद न्यायालयात गेला. ब्राह्मणेतरांच्या बाजूचं वकीलपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं. पुण्याचं सामाजिक सौहार्द खराब झालं होतं. त्याचे डाग आजही दिसतात. त्यात आता ‘टिळक की रंगारी?’ हा वाद उफाळला आहे. टिळक ब्राह्मण आणि रंगारी (जावळे) मराठा, ही जात पार्श्वभूमी या वादात अधिक तेल ओतणार हे ओघानं आलंच.
‘रंगारी की टिळक?’ हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयातही गेला आहे. पुणे महानगरपालिकेनं या वर्षी गणेशोत्सवाचं 125वं वर्ष धूमधडाक्यात साजरं करण्याचा घाट घातला आणि या वादाला तोंड फुटलं. गणेशोत्सवाच्या 125व्या वर्षाच्या लोगोचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करायचं होतं, तेव्हा हा वाद विकोपाला गेला. लोगोवर कुणाचं छायाचित्र असावं, टिळकांचं की रंगारी यांचं, यावरून कार्यकर्त्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरू झाली. शेवटी गणपतीचं छायाचित्र घ्यावं, दोघांचंही नको असा तोडगा काढला गेला खरा, पण तो तात्पुरता ठरला. त्यानंतर रंगारी गणपती ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. उपोषणं, निदर्शनं इथपर्यंत मामला गेला. रंगारी ट्रस्टचं म्हणणं असं की, ज्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे. इतिहास पुसता कामा नये. रंगारी यांनी पहिल्यांदा गणेशोत्सव सुरू केला आहे, तर त्यांचं श्रेय का पळवलं जातंय? ‘तुम्ही टिळकांचा द्वेष करताय? मुद्दाम या विषयाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर रंग देताय, वाद माजवताय’ असा, प्रचार काहींनी सुरू केला आहे. भाऊसाहेब रंगारी यांचा इतिहास जाणकारांनी पुढे आणला आहे. त्यातून त्यांच्याविषयी बरीचशी माहिती उपलब्ध झाली आहे. रंगारी हे एक क्रांतिकारक कार्यकर्ते होते. पुण्यात त्यांच्या वाड्यात क्रांतिकारकांना गुप्तपणे शस्त्र चालवण्याचं शिक्षण दिलं जाई. आपल्या सहकार्यांसमवेत ते इंग्रजांविरोधात क्रांतिकार्य करत असत. त्यांच्या वाड्यात नुकताच शस्त्रसाठाही सापडला आहे. रंगारींचा शालूंना रंग देण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचं ‘जावळे’ हे आडनाव मागे पडून ‘रंगारी’ हे टोपणनाव रूढ झालं. रिचर्ड कॅशमन (Richard I. Cashman) या इंग्रज लेखकानं “The Myth of Lokmanya : Tilak and Mass Politics in Maharashtra’ या पुस्तकात रंगारी यांचा उल्लेख केला आहे. त्यात कॅशमन यांनी म्हटलं आहे की, “Bhau Lakshman Javale was a Maratha whom the Police considered an extremely dangerous and troublesome man. या उल्लेखावरून इंग्रजांना रंगारींचा किती दरारा वाटत होता, हे लक्षात येईल. रंगारी ख्यातनाम वैद्यही होते. 1982 साली सर्वप्रथम पुण्यात रंगारींनी गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या पुढच्या वर्षी 26 सप्टेंबरला 1893च्या दै. ‘केसरी’च्या अग्रलेखात स्वत: टिळकांनी लिहिलंय की, ‘सालाबादाप्रमाणे यंदा गणेशोत्सवास अधिक सार्वजनिक स्वरूप आलं असून ज्या गृहस्थांनी गेल्यावर्षी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत.’ तेव्हा, टिळक-रंगारी वाद रस्त्यावर येण्याआधीच तो मिटवायला हवा. पुण्यात अनेक शहाणी माणसं राजकारण-समाजकारणात आहेत. त्यांनीही पुढे आलं पाहिजे. अन्यथा हा वाद ऐन गणेशोत्सवात पेटला तर राज्याच्या सांस्कृतिक चेहर्यावर आणखी एक डाग पडून तो अधिक विद्रूप होऊ शकतो. गणेशोत्सवात सर्वांनी सामाजिक सौहार्द, एकोपा जपला पाहिजे. गणेशोत्सवासारख्या एकीच्या सणात ‘बेकीचं राजकारण’ माजणं बरोबर होणार नाही.
राजा कांदळकर- 9987121300