नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० या काळात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठीचा संघ आज जाहीर केला. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना २१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दुसरा सामना २४ रोजी बांगालदेशविरुद्ध होणार आहे. तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध २७ रोजी खेळवला जाईल. साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध २९ रोजी मेलबर्नमध्ये होईल. साखळी फेरीनंतर ए आणि बी ग्रुपमधील टॉप संघ सेमीफायनलमध्ये खेळतील. दोन्ही सेमीफायनल ५ मार्चला मेलबर्न मैदानावर तर फायनल लढत ८ मार्च रोजी मेलबर्नवर होणार आहे.
असा आहे भारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जॅमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रीचा घोष, तानिया भाटीया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्तरकर आणि अरुंधती रेड्डी