गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस तैनात
पुणे ः शिवसेनेची महत्त्वकांक्षी योजना शिवभोजन थाळी योजनेचा प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना फक्त 10 रुपयांत जेवण देण्यात येत आहे. योजना सुरू झाल्याच्या तीन दिवसांतच योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. या रांगावर नियंत्रण ठेवण्यासाठी चक्क पोलिसांना तैनात करावे लागले. पुण्यात सात ठिकाणा शिवभोजन केंद्र सुरू आहेत. केवळ दहा रुपयांत जेवण मिळत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. सर्वच शिवभोजन केंद्रावर कमी-अधिक प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
मागणीच्या तुलनेत थाळीचा पुरवठा कमी…
शहरातील मार्केट यार्ड येथील शिवभोजन केंद्रावर तुफान गर्दी होत आहे. येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी शेतीमाल घेऊन येतात. त्याचबरोबर हमाल, छोटे व्यापारी आणि कष्टकर्यांची मोठी संख्या असल्याने केंद्र सुरू होण्यापासूनच येथे रांगाच रांगा दिसतात. येथील गर्दीमुळे वाद-विवाद झाल्याने केंद्र चालकांना थेट पोलिसांना पाचारण करावे लागले. पुण्यात 12 ते 2 या वेळेत शिवभोजन थाळी मिळते. येथील मार्केट यार्डमध्ये पुण्यासह परिसरातील शेतकरी दाखल होतात. त्यामुळे मागणीच्या तुलनेत थाळीचा पुरवठा कमी होत आहे. यामुळे रांगेत उभे राहून भोजनथाळी मिळत नसल्याचे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.