डॉ. पद्माकर पंडीत यांच्याकडे अद्यापही विशेष कार्य अधिकारी पद
मान्यता नसताना नियुक्ती
पिंपरी चिंचवड ः महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्तीस असलेले डॉ. पद्माकर पंडित यांच्या नियुक्तीला कुठलीही मान्यता नसताना त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांची नियुक्ती अपात्र असून त्यांना त्वरित राज्य शासनाच्या सेवेत पाठविण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणीचे पत्र दिले आहे. सदर डॉ. पंडित यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी दि. 17 फेबु्रवारी 2019 रोजी संपुष्टात आलेला आहे. तरी सुध्दा डॉ. पद्याकर पंडीत कार्यरत आहेत. त्यामुळे त्याची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
17 फेब्रुवारीला नियुक्ती संपुष्टात
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. सदर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी मनपाने शासनाकडे सहा महिन्याकरीता अधिष्ठाताची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने 1 वर्षासाठी डॉ. पद्माकर पंडीत, प्राध्यापक, औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक वर्ष मुदत संपल्यानंतर नगरविकास विभागाने अजून एक वर्षासाठी प्रतिनियुक्ती केली आहेे. परंतु, या एक वर्षमुदतवाढीची मान्यता घेण्यात आलेली नाही. डॉ. पंडित यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी दि. 17 फेब्रुवारीला 2019 रोजी संपुष्टात आलेला असून त्यांची नियुक्ती नियमबाह्य आहे.
गेली दोन वर्षांपासून डॉ. पद्याकर पंडीत मनपाकडे विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्त असूनही अद्यापही सदरचा अभ्यासक्रम सुरु झालेला नाही. त्यातच या अभ्यासक्रमासाठी विविध संवर्गांतील पदे मानधनावर भरण्यात आलेली आहेत. हि मानधनावरील पदे नियबाह्य पध्दतीने कुठल्याही प्रकारची जाहीरात न नियमित वेतनश्रेणीमध्ये भरण्यासाठी माहे फेब्रुवारीच्या महापालिका सभेपुढे उपसुचनेव्दारे प्रयत्न करण्यात आला. परंतु तो सफल झाला नाही. यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे, असा आरोप साने यांनी केला आहे.
पात्र अधिकार्यांची नियुक्ती व्हावी
क्रियाशुन्य, बेजबाबदार, भष्ट्राचारी विशेष कार्य अधिकार्यांची मनपास गरज नाही. तसेच ते वयाच्या अर्हतेमध्येही बसत नाहीत त्यामुळे त्यांना तात्काळ राज्य शासनाच्या सेवेमध्ये परत पाठविण्यात यावे. व शासनाकडे या अभ्यासक्रमासाठी नविन हुशार अनुभवी ज्येष्ठ अधिकार्यांची मागणी करण्यात यावी. किंवा मनपातील पात्र ज्येष्ठ वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.