डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते संशयाच्या भोवर्‍यात अडकलेले – डॉ. मोहन आगाशे

0

डॉ. प्रकाश जावडेकर लिखित ‘डॉक्टर होणे एक आव्हान’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : डॉक्टर आणि रुग्ण यांचे आपापसातील नाते हे सेवा आणि विश्‍वास या धाग्यांनी पूर्वी गुंफलेले होते. पंरतू त्याचे रुपांतर आता ग्राहक आणि विक्रेता या स्वरुपात झालेले आहे. हा डॉक्टर मला लुटणार या संशयाने रुग्ण डॉक्टरांकडे, तर हा रुग्ण मला कोर्टात खेचणार या संशयाने डॉक्टर रुग्णाकडे पाहत असतो. एकंदरीतच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील निकोप नाते लयास जाऊन हे नाते संशयाच्या भोवर्‍यात अडकले असून ते गढूळ झाले असल्याची खंत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि ज्येष्ठ अभिनते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश जावडेकर लिखित आणि कॉन्टिनेंन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ’डॉक्टर होणे एक आव्हान’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आगाशे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. रविन थत्ते, डॉ. नंदू लाड, अमृता कुलकर्णी, लेखक डॉ. प्रकाश जावडेकर, डॉ. सुषमा जावडेकर याप्रसंगी उपस्थित होते.

नवीन प्रयोग राबविण्याची गरज

नाडी वैद्यशास्त्र जाऊन आता विविध रीपोर्टर्सवर आधारीत रुग्ण तपासला जातो. अलिकडील डॉक्टर रुग्णाला तपासण्याऐवजी रीपोर्टर्सच तपासत असतो. आरोग्यसेवा मिळण्यासाठी काही नवीन प्रयोग राबविण्याची आवश्यकता असून लोकसहभागातून रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालयांची साखळी निर्माण होणे गरजेचे आहे. लोकसहभागाशिवाय आरोग्यसेवेशी संबंधीत प्रश्‍न सुटणे अवघड आहे, असे डॉ. नंदकिशोर लाड यांनी यावेळी सांगितले.

डॉक्टरांना रुग्णांकडून सहकार्याची अपेक्षा

नकळत डॉक्टरकीचे व्यवसायात रुपांतर झाले असून रुग्ण सेवा देणार्‍या डॉक्टरांपेक्षा भांडवलदारांच्या हातात हा व्यवसाय स्थिरावला आहे. हे भांडवलदार व्यवसायीक तज्ज्ञ डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन ते सांगतील तशी रुग्णसेवा चालवण्यास भाग पाडत आहेत. या भांडवलदार व्यवसायिकांनी डॉक्टरीपेशा हायजॅकच केला आहे. रुग्णसेवा देताना डॉक्टरांनी दोन श्‍वासातील जे अंतर आहे ते अंतर सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णांच्या डॉक्टरांकडून जशा अपेक्षा असतात त्याचप्रमाणे डॉक्टरांची देखील रुग्णांकडून सहकार्याची अपेक्षा असते. पंरतु हे नाते अव्दैताकडून व्दैताकडे सरकल्याने गंभीर समस्या उद्भवल्याचे डॉ. आगाशे यांनी सांगितले.

जन्म, मृत्यू आणि जीवन हे आयुष्यातील चिरकाल संस्कार जाऊन आता बाजारीकरण संस्कृती रुजली आहे. आरोग्य हा केवळ डॉक्टरांशीच निगडीत प्रश्‍न नसून तो रुग्णानांदेखील लागू होतो. आरोग्य ही दोघांची समसमान जबाबदारी आहे. हे विसरून चालणार नाही, असे डॉ. आगाशे यांनी सांगितले.