डॉ. सिंग यांच्या देशनिष्ठेबद्दल शंका नाही!

0

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर बेफाम आरोप करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या काँग्रेस खासदारांसमोर अखेर भाजपला एक पाऊल मागे घ्यावे लागले. मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची देशाशी असलेल्या बांधिलकीवर प्रश्न उपस्थित केले नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले. या दोघांच्या भारताप्रतीची निष्ठा आणि बांधिलकीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नव्हते. तसा मूळात हेतूच नव्हता. आमच्या मनात मनमोहन सिंह आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याबद्दल प्रचंड आदराची भावना आहे, असेही जेटली यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संसदेतला ’डेडलॉक’ संपला.

काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे कामकाज ठप्प
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचा आरोप केला होता. खर तर तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचेही मोदी म्हणाले होते. मला पदावरुन हटवण्यासाठी अय्यर यांनी पाकमधून सुपारी घेतली होती, असा गंभीर आरोपही मोदींनी प्रचारसभेत केला होता. अय्यर यांच्या घरी पाक अधिकार्‍यांसोबत बैठक झाली आणि दुसर्‍या दिवशी मला हिणवले. गुजरातमध्ये निवडणूक सुरु असताना ही बैठक का घेतली, या बैठकीत डॉ. मनमोहन सिंग, हमीद अन्सारी आदी मंडळी का उपस्थित होती, याकडेही मोदींनी लक्ष वेधले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसने हा मुद्दा लावून धरताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. मोदी यांनी संसदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली होती. त्यासाठी दररोज संसदेत गोंधळसत्र सुरु होते.

जेटलींच्या वक्तव्यावर काँग्रेस समाधानी
संसदेतील गोंधळ संपुष्टात आणण्यासाठी भाजपकडून अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपने थेट माफी मागितली नाही; पण मोदींचा मनमोहन सिंग यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नव्हता असे सांगितले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून मनमोहन सिंग किंवा हमीद अन्सारी यांच्या बांधिलकीबद्दल शंका उपस्थित केली नाही. असा कोणाचा दृष्टीकोन असेल तर तो चुकीचा आहे, असे जेटली यांनी राज्यसभेत सांगितले. आम्ही या दोन्ही नेत्यांचा आदरच करतो. त्यांच्या देशाबद्दलच्या निष्ठेलाही आम्ही मानतो, असे जेटली यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधान मोदी संसदेत उपस्थित नव्हते. दरम्यान, जेटली यांनी दिलेल्या निवेदनानंतर काँग्रेसनेही नरमाईची भूमिका घेतली. या प्रकरणावर निवेदन दिल्यामुळे आम्ही जेटली यांचा मान राखतो. त्यामुळे यापुढे संसदेचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचे आश्वासन आम्ही देतो. विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांना सहकार्यच करेल, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांनी स्पष्ट केले.